सिनेमा- केवळ मनोरंजन नव्हे तर विचार मांडण्याचे माध्यम असतं असं म्हटलं आणि आजकालचे बॉलीवूडचे सिनेमे पहिले तर हे वाक्य थाप वाटावी असं सत्य. पण अधेमधे कुणीतरी राजू हिरानी सारखा दिग्दर्शक हि ‘थाप’ अगदी सत्य ठरवून जातो. येणार येणार अशी ज्याची गेली अनेक महिने चर्चा होती तो ‘PK’ अखेर आला. मुळात राजकुमार हिरानीचा सिनेमा, त्यात पुन्हा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान असल्याने या सिनेमाची उत्सुकता अगदी शिगेला पोहचली होती. सिनेमाची कथा अजिबातच ‘LEAK’ होता कामा नये याची दाखल अत्यंत जाणीवपूर्वक घेतली गेली आणि इथेच त्यांनी अर्धी लढाई जिंकली. राहिला प्रश्न चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मिळणाऱ्या प्रतिक्रियांचा तर सिनेमा पाहतांना आमीर सोबतच समोरच्या प्रत्येक प्रेक्षकांच्या भुवया उंचावलेल्या आणि डोळे विस्फारलेले राहतात यातच सारं आलं. कथेचे वेगळेपण, पुढे काय हि उत्सुकता, मांडणीची पद्धत, कथेची गुंफण, राजू हिरानीचे दिग्दर्शन आणि कलाकारांचा अभिनय या साऱ्यांचे अत्यंत शिताफीने केलेले मिश्रण म्हणजे हा सिनेमा. शीर्षक जितके हटके तितकाच चित्रपटही हटकेच. पुन्हा एकदा या जोडगोळीने कमाल दाखवत ‘करोड क्लब’च्या नव्या विक्रमाला हात घातला आहे. या सिनेमात वापरलेला ‘वेगळा चष्मा’ हि सर्वात जमेची बाजू ठरते.
राजू हिरानीने नेहमीप्रमाणे कथेचे वेगळेपण इथेही कायम जपले. मानव आणि एलियन या अजब नात्याचा सिनेमातील एक पदर म्हणून चांगला वापरला. सिनेमाच्या सुरुवातीलाच आमीर एक एलियन म्हणून पृथ्वीवर येतो. हीच सुरुवात मग आता पुढे काय हा प्रश्न साहजिकच उभा राहतो. एलियनच्या येण्यापासून ते जाण्यापर्यंतचा सारा प्रवास दिग्दर्शकाने विनोदी शैलीत पण अनेक प्रश्न उभे करत मांडला आहे. सिनेमा पूर्ण विनोदी असला तरी तो आजच्या समाजावर केलेला विनोद आहे. तिथे दिग्दर्शक आपल्या मांडणीची छाप निश्चित सोडून जातो. आमिरच एलियन असून इथल्या रंगरूपात परावर्तीत होणं, त्याच्या माणूस म्हणून जगण्याच्या निरनिराळ्या तऱ्हा, अनुष्का शर्माचं(जग्गू) पत्रकार म्हणून भेटणं, तिने एलियनची न्यूज स्टोरी म्हणून वापर करणं, त्यातून जुनेच पण नव्याने उभे राहणारे प्रश्न या सगळ्याची गुंफण लाजवाब झाली आहे. राजू हिरानीने स्वतःच एडिटरची कात्री हातात धरल्याने सिनेमाचा प्रत्येक सीन अगदी विचारपूर्वक तोडला आणि जोडला गेलाय. कुठेच छोटा देखील जंप कट जाणवत नाही. खुर्चीला खिळवून ठेवणारे एडिटिंग करण्यात तो यशस्वी झाला आहे. सिनेमा कुठेही रेंगाळणारा वाटत नाही उलट उत्सुकता वाढवतच जातो.
कलाकारांचा अभिनय हि मोठी बाजू नेहमीच हिरानीच्या सिनेमाची शक्ती असते. बोमन इराणी, सौरभ शुक्ला, संजय दत्त, सुशांत राजपूत यांच्या भूमिका कमी लांबीच्या असल्या तरी त्या पूर्ण ताकतीने कलाकारांनी रंगवल्या आहेत. अनुष्का शर्मा हिची दुय्यम भूमिका असली तरी तिने ती उत्तम पेलली आहे. तिचा स्पेशल लूक सुद्धा भाव खावून जातो. विशेषतः अनुष्काने या सिनेमात आपली स्वतंत्र छाप सोडली आहे हे मान्य करावेच लागेल. राहिला तो आमिरचा प्रश्न. मि. परफेक्शनिस्ट हे वेगळचं रसायन आहे हे पुन्हा सिध्द झालं. त्याने नेहमीप्रमाणे आपल्या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत सहजपणे जाणवून येते. त्याचे डोळे आणि केवळ चेहऱ्यावरील हावभाव संपूर्ण चित्रपट व्यापून टाकतात. त्याचा तो चेहरा त्याला अप्रत्यक्षपणे सामान्य मानवापेक्षा वेगळा लूक मिळवून देतात. आपल्या कल्पनेतला एलियन नाही आणि अगदीच आपल्यासाराखाही नाही असा काहीसा PK साकारण्यात तो यशस्वी ठरलाय. आमिरचा सिनेमा म्हटलं कि मग साहजिकच त्याच्याकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात, या अपेक्षा तो तंतोतंत पूर्ण करतांना दिसतो.
पण या साऱ्यांपेक्षा कौतुक करावेसे वाटते ते राजू हिरानीचेच. एक अफलातून कल्पना त्याने खूप विनोदी ढंगात दाखवली. चित्रपटातील सर्वात वेगळी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सध्याच्या समाज जीवनावर केलेले व्यंग! दिग्दर्शक म्हणून त्याने या विषयाला यशस्वी गवसणी घातलीच पण तो विषय त्याने कोळून प्यायला आहे असेच वाटते. आपल्या आजूबाजूच्या धार्मिक जीवनावर अत्यंत सफाईदारपणे टीका त्याने केली मात्र ती विनोदिशैलीत. हि गुंफण फार अवघड होती मात्र त्याने ती लीलया पेलली. अगदी हिंदू विधवा – पांढरारंग – ख्रिश्चन मॅरेज – फ्युनरल – काळा रंग – मुस्लीम महिलांचा बुरखा हा सारा कोलाज त्याने पडद्यावर शिताफीने मांडत बोचरी टीका सुद्धा केली. दुसर्या एका सीन मध्ये हिंदू देवेता – नारळ अगरबत्ती – येशू – वाईन – मस्जिद हा प्रवास करतांना आपल्या परस्पर विरोधी प्रथांना चिमटा काढायला विसरला नाही. हि सारी किमया त्याने विचारांची मोन्ताज पद्धत वापरून केली. ‘रॉंग नंबर’, ‘ठप्पा’ अशा विविध खोचक शब्दातून मानवाच्या धर्मातील विभाजनावर सणसणीत वार केलेत.
मी सुरुवातीला म्हटल्या प्रमाणे त्याने या चित्रपटात वापरलेला ‘चष्मा’ हाच या चित्रपटाचा आत्मा आहे. हा चष्मा म्हणजे आपल्याच समाजाकडे त्रयस्थ म्हणून एलियनच्या नजरेतून पाहणे. इथले धर्म, जाती, पंथ, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, अमूर्त विश्वास यांच्याकडे पाहण्यासाठी आणि आपल्याला ते दाखवण्यासाठी हा चष्मा वापरला. या चष्म्यातून पाहतांना हे सारे कसे धार्मिक थोतांड वाटते याची प्रचीती इथे येते. अगदी नोटेवरचे गांधीच फक्त महत्वाचे आणि इतर कुठल्याच कागदावरले गांधी महत्वाचे नाही हे सूचक वक्तव्य अत्यंत सहज व सुंदर पद्धतीने त्याने मांडले.
निश्चितच हा सर्व प्रकार त्याने अत्यंत धाडसाने, अभ्यासाने व अपार कष्टाने मांडला आहे. प्रत्येक सीन मध्ये विनोदापलीकडे एक-एक गोष्ट त्याने अत्यंत मार्मिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त त्या विनोदामागची टीका ज्याला कळली आणि आपसूक तोंडातून वाह! शब्द बाहेर पडला, त्यालाच राजू हिरानीचा हा अफलातून प्रयत्न कळला. फक्त भीती एकच वाटते ती म्हणजे, त्याने समाजजीवनाच्या थोतांडावर केलेल्या भाष्यावरच्या विनोदी आवरनालाच जर प्रेक्षक भुलला तर मात्र त्याचा हा संदेश लोकांपर्यंत पोहोचणार नाही आणि इतका सुंदर प्रयोग केवळ मनोरंजन म्हणून उरेल. म्हणूनच मी त्याला ‘डायल केलेला परफेक्ट रॉंग नंबर’ म्हटले, फक्त लोकांनी नेमकेपणाने तो ‘रिसीव्ह’ करावा एवढीच त्याचीही आणि माझीही अपेक्षा....
राजू हिरानीच्या या अफलातून प्रयोगाला सलाम.....
Monday, December 22, 2014
‘PK’- डायल केलेला परफेक्ट ‘रॉंग नंम्बर’
Wednesday, November 5, 2014
जातीवादाने बरबटलेला महाराष्ट्रीय जिहाद...
जिहाद म्हटला कि आपल्या डोळ्यापुढे येतो तो केवळ मध्य आशिया आणि त्यातील धार्मिक तेढ. पण जिहाद हा धर्म घटक नसून ती वृत्ती-प्रवृत्ती आहे हा विचारच आपल्याला शिवत नाही. आता तुम्ही म्हणाल कि असली जरी ही प्रवृत्ती तर त्याचा महाराष्ट्रात काय संबंध? इथे कुठे होतोय जिहाद? निश्चित इथे जिहाद होतोय. इथला जिहाद मुस्लीम समाज करत नाहीये, तर इथे जिहाद करतोय तो हिंदू समाज. नक्कीच मी बोलतोय ते केवळ धाडस नाही तर उघड सत्य आहे. खैरलांजी असो वा खर्डा किंवा आताच जवखेडा असो. इथे होणारे हत्याकांड नाहीत तर अमानुषपणे चाललेला हिंदू जिहादच आहे. जिहाद पुकारला जातो तो परधर्मीयांविरोधात, पण इथे मात्र हिंदू-हिंदू मध्येच या जिहादला तोंड फुटलं आहे. पुरोगामी आणि पुढारलेला महाराष्ट्र या गोंडस वाटणाऱ्या नावाखाली काहीकाळ छुपा आणि आता उघडपणे मांडलेला जातीवाद मूळ धरू लागला आहे.
जातीवाद संपला, आता कुठे शिल्लक राहिलाय जातीपातीचा प्रश्न असे आपण म्हणतो पण खरच तथ्य आहे का त्यात. जर असेल तथ्य तर का घडतायत या घटना. याचा विचार कोण करणार आहे? आपल्याला कुठे फरक पडतोय? याची झळ आपल्याला कुठे बसतेय? असेच जर प्रश्न पडत असतील तर आणखी एक प्रश्न स्वतःलाच विचारावा, मी याच समाजाचा भाग आहे कि आणखी कोणत्या? उत्तर तुमच तुम्हालाच सापडेल. मुळात या सगळ्याचे एकच उत्तर आहे ते म्हणजे इथल्या समाजाच्या घटकांमध्ये खोचून खोचून भरलेली बुरसट आणि मागास वृत्ती. माणसाला माणसाच्या नजरेने न पाहता, त्याच्याकडे जनावराच्या नजरेने पाहणं किंवा त्यहिपेक्षा नीच नजरेने पाहणं ही कोणती प्रवृत्ती? ही प्रवृत्ती आकाराला येऊन आता अनेक युगे उलटली पण तीच कुजलेली मानसिकता घेऊन आज एकविसाव्या शतकात थोबाड वर करून आपला समाज वावरतो आहे.
आर्य असणाऱ्या ब्राम्हणांनी जे ३००० वर्षांपासून पेरून ठेवलं तेच डोक्यावर घेऊन नाचणारा सवर्ण आजही दिसतोय यातच सगळं आलं. जातीपातीची फुशारकी मिरवर्यांना आपल्याच इतिहासाची माहिती नसली तरी आपण ब्राम्हणांपेक्षा कमी का असेना पण किमान दलितांच्या वरचढ आहोत यात जणू स्वर्गसुख वाटतं. हे फुटकळ स्वर्गसुख मिरवत आयुष्य घालावण्यातच धन्यता वाटावी यासारखे दुसरे हास्यास्पद काय असेल. आपला वास्तविक आगापिच्छा माहित असो ना असो मी सवर्ण आहे हे महत्वाचे ही भिकार मानसिकता अंगी बाळगण्यात कसलं आलंय शहाणपण? पण का हे विसरताहेत कि ज्यांच्यावर आपण हा अमानुष अन्याय करतो आहोत ते माझ्याच समाजाचे घटक आहेत किंबहुना माझ्याच रक्ताचा भाग आहेत आणि ज्यांची अक्कल आपण गेली अनेक वर्षे भाड्याने घेतली आहे ते रक्त मुळात परकं आहे. मात्र हे कसं मान्य होणार. ब्राम्हण म्हणजे देव यांना! देवाला दुखवून कसे चालेल बरे? ब्राम्हण कोप झालाच तर कुठे जावं? कोण वाली उरेल आम्हांस? ही यांची विचारसरणी. ज्याच्या नावावर हा जगाचा फुल शो चालवला जातो तो परमपिता ब्रम्हा जरी आला आणि त्याने विनवण्या जरी करून सांगितल्या तरी यांना ब्राम्हणांनी सांगितलेलं ज्ञानच पवित्र वाटेल. या असल्या सवयीमुळेच ब्राम्हणांनी आपल्या पोळ्या यांच्याच पाठीवर भाजल्या. आपली पाठ सोलपाटून निघाली याच काही नाही पण ब्राम्हणाच पोट भरलं यात सुख मानणारे हे सवर्ण.
नगर जिल्ह्यातच खर्डा येथे नितीन आगे नावाच्या कोवळ्या मुलाचा गुन्हा काय होता कि त्याला मरेपर्यंत मारले? तथाकथित उच्च वर्णीय मुलीसोबत प्रेम केलं हेच? एकाबाजूला असले भिकार विचार मनात ठेवायचे आणि दुसऱ्याबाजूला याच बड्या धेंडांना आपल्याच शेतात, ऊसात दलित स्त्रिया, मुली भोगायला चालतात. पोटाला रोजगार देतो म्हणून त्यांच्या गरिबीचा फायदा उठवतांना हा जातीपातीचा बाणा कुठं जातो? हे धंदे करतांना का आठवत नाही ‘मोडेन पण वाकणार नाही’ हा ताठर बाणा? आपल्या पोरीबाळींना तेवढी अब्रू असते आणि दलितांच्या अब्रू काय अशा उघड्यावर पडल्या आहेत का? पर जातीत प्रेम करणे जर यांच्या दृष्टिकोनातून गुन्हाच असेल तर मग ज्या सवर्ण मुलीसोबत त्याचे प्रेम होते तिला का जिवंत ठेवलीय? तिला नाही का शिक्षा देवू वाटत या न्यायवाद्यांना? का ती सवर्ण म्हणून पवित्र? त्या कोवळ्या जीवाला फासावर लटकवायला यांना लाज वाटू नये? सोनाई प्रकरणात कडबा कापायच्या कोयत्याने तुकडे करतांना कुठला पुरुषार्थ दाखवला गेला? खैरलांजी प्रकरणात शिक्षा सुनावल्यावर सुद्धा यांच्या चेहऱ्यावर आपल्याकडून गुन्हा घडल्याचा साधा भाव नसतो. आपण जणू लाज वाटण्यासारखे काही केलेच नसल्याचा आव आणणारे महाभाग हे. मानावतेसाठीची दया यांच्या अंगी नाही. जवखेडा मध्ये दलित कुटुंबावर अमानुष अत्याचार कुठल्या मानसिकतेने झाला? खून होणे ही जरी एक नेहमीची बाब असली तरी कटर ने देहाचे तुकडे करणे या अमानुष आणि बिभित्स वृत्तीला काय म्हणायचे? माणूस म्हणून जगण्यापेक्षा मग सरळ आम्ही सैतान आहोत हे जाहीर करा आणि मग असे वागा?
मुळात या सवर्णांचा अहं भाव दुखवायला लागल्यापासूनच या सगळ्या घटनांना सुरुवात व्हायला लागली आहे. काल परवापर्यंत दोन घास खायला न मिळणाऱ्या जातीचे आज प्रगती करतायत, आपल्या रांगेत कुठेतरी उभे राहतायत, आपल्या खांद्याला खांदा लावून समाजात वावरत आहेत हे डोळ्याला खुपायला लागलं आहे. गेली ३००० वर्षे तुम्ही आमच्या डोक्यावर पाय ठेवून नाचला तेव्हा हा विचार कुठे गेला होता? आता जरा कुठे दलितांचे पंख फडफडले तर लगेच त्रास व्हायला लागला? आता तर कुठे सुरुवात आहे तोवर ह्या घटना घडत आहेत जेंव्हा अगदी सगळ्यांच्या बरोबरीने हा दलित समाज प्रगती करेल तेव्हा काय उघड पणे चौकाचौकात तुम्ही मुडदे पाडत फिरालं. या सगळ्यात कपाळावर सद रक्षणाय खल निग्रहणाय असं मिरवत फिरणाऱ्या खाकीला तर सलाम! यांनी नेमकी कुणाच्या सरंक्षणाची शपथ घेतलीय ते कळतचं नाही. दलितांवर होणारे अन्याय यांच्या गावीच नसतात. एखादा दलित चोर यांना लगेच सापडतो मात्र दलितांवर अन्याय करणारे यांना आयुष्यभर सापडत नसतात. खैरलांजी प्रकरणात दबाव अनावर झाला म्हणून शेवटी न्याय देन भाग पडलं. मग बाकीच्या प्रकरणात का घडत नाही हे.
दलित चळवळी जरा कुठे डोक्यावर जाऊ लागल्या कि आता काय नवीन फंडा शोधून काढलाय, दलितांच्या चळवळीत नक्षलवाद्यांनी हात घातला आहे असं म्हटलं कि झालं. उठसुठ असे आरोप केले कि एक दिवस सगळ्यांना पटणार हे. परंतु आज घडणारे अन्यायी भ्याड हल्ले असेच होत राहीले आणि त्याविरोधात आवाज उठवणार्या दलित तरुणांना जर असेच नक्षलवादी संबोधले जाऊ लागले मग वैफल्यातून या समाजाने भविष्यात नक्षलवाद जवळ केला, तर त्याला जबाबदार कोण असेल? हातात तंबाखू चोळत हे सारं पाहणारी आणि सामाजिक समानतेची 'थाप' मारणारी शासन व्यवस्था? या सगळ्यांच्या वर माध्यमे आपली जबाबदारी पार पाडतात. माध्यमांना पंतप्रधानांनी आज या रंगाचा सदरा घातला, त्या रंगाचे जाकेट घातले हे तासातासाला दाखवण्यात अधिक रस असतो, पण महाराष्ट्रात यांच्याच नाकाखाली उघडपणे ही अमानुष हत्याकांडे घडतात त्याच सोयरसुतक नसतं. एखादी बातमी दिली की संपल. तो मुद्दा लावून धरण्यात यांना घेनदेन नसतं. या सगळ्यात लढलं पाहिजे ते केवळ दलित चळवळींनी हा जणू प्रघातच पडला आहे. इथे सामान्य समाजाला याचे काही उरले नाहीये. मरणारा माझा कुणी नाही ना? मग मी कशाला उभा राहू ही मानसिकता. या हत्यांकडे केवळ दलित हत्या म्हणून न बघता, आपल्याच समाजातील घटकाची अमानुष आणि क्रूर हत्या म्हणून पाहिली तर जाणिवा जिवंत आहेत समाजाच्या असं म्हणता येईल.
पण एक मात्र खरे इथून पुढे महाराष्ट्राने पुरोगामी आणि आधुनिक महाराष्ट्र असले झेंडे घेऊन वाटचाल करू नये आणि असली विशेषणे सुद्धा लावून मिरवू नये. उठसुठ असा खुलेआम एक समाज दुसऱ्या समाजाचे गळे चिरत असेल आणि त्याला कारण केवळ आणि केवळ जातपात असेल त्याला काय अर्थ उरतो. आपल्याच मातीतल्या मानव नावाच्या श्वापदांचे हे अमानुष आणि किळसवाणे उद्योग पाहून ना त्या शिवरायांना बरं वाटत असेल ना आंबेडकरांना आपण समानता मिळवून दिली याचं समाधान मिळत असेल. पण इथल्या कर्म आणि बुद्धीने दरिद्री समाजाला कोण समजावणार? इथे जातीची मिजास प्यारी. मानातल्या मनात अजूनही इथे अस्पृश्यता जपलेलीलीच आहे हे आता उघड आहे. शासनाने सुद्धा आता हा समानतेचा झेंडा खाली उतरवावा मग हे सारे हल्ले बांगड्या भरून सगळ्या समाजाने डोळे भरून पाहत बसावे. तो शोभेल माझा निधड्या छातीचा आधुनिक महाराष्ट्र. जय पुरोगामी महाराष्ट्र!
