Monday, December 22, 2014

‘PK’- डायल केलेला परफेक्ट ‘रॉंग नंम्बर’


         सिनेमा- केवळ मनोरंजन नव्हे तर विचार मांडण्याचे माध्यम असतं असं म्हटलं आणि आजकालचे बॉलीवूडचे सिनेमे पहिले तर हे वाक्य थाप वाटावी असं सत्य. पण अधेमधे कुणीतरी राजू हिरानी सारखा दिग्दर्शक हि ‘थाप’ अगदी सत्य ठरवून जातो. येणार येणार अशी ज्याची गेली अनेक महिने चर्चा होती तो ‘PK’ अखेर आला. मुळात राजकुमार हिरानीचा सिनेमा, त्यात पुन्हा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान असल्याने या सिनेमाची उत्सुकता अगदी शिगेला पोहचली होती. सिनेमाची कथा अजिबातच ‘LEAK’ होता कामा नये याची दाखल अत्यंत जाणीवपूर्वक घेतली गेली आणि इथेच त्यांनी अर्धी लढाई जिंकली. राहिला प्रश्न चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मिळणाऱ्या प्रतिक्रियांचा तर सिनेमा पाहतांना आमीर सोबतच समोरच्या प्रत्येक प्रेक्षकांच्या भुवया उंचावलेल्या आणि डोळे विस्फारलेले राहतात यातच सारं आलं. कथेचे वेगळेपण, पुढे काय हि उत्सुकता, मांडणीची पद्धत, कथेची गुंफण, राजू हिरानीचे दिग्दर्शन आणि कलाकारांचा अभिनय या साऱ्यांचे अत्यंत शिताफीने केलेले मिश्रण म्हणजे हा सिनेमा. शीर्षक जितके हटके तितकाच चित्रपटही हटकेच. पुन्हा एकदा या जोडगोळीने कमाल दाखवत ‘करोड क्लब’च्या नव्या विक्रमाला हात घातला आहे. या सिनेमात वापरलेला ‘वेगळा चष्मा’ हि सर्वात जमेची बाजू ठरते.
       राजू हिरानीने नेहमीप्रमाणे कथेचे वेगळेपण इथेही कायम जपले. मानव आणि एलियन या अजब नात्याचा सिनेमातील एक पदर म्हणून चांगला वापरला. सिनेमाच्या सुरुवातीलाच आमीर एक एलियन म्हणून पृथ्वीवर येतो. हीच सुरुवात मग आता पुढे काय हा प्रश्न साहजिकच उभा राहतो. एलियनच्या येण्यापासून ते जाण्यापर्यंतचा सारा प्रवास दिग्दर्शकाने विनोदी शैलीत पण अनेक प्रश्न उभे करत मांडला आहे. सिनेमा पूर्ण विनोदी असला तरी तो आजच्या समाजावर केलेला विनोद आहे. तिथे दिग्दर्शक आपल्या मांडणीची छाप निश्चित सोडून जातो. आमिरच एलियन असून इथल्या रंगरूपात परावर्तीत होणं, त्याच्या माणूस म्हणून जगण्याच्या निरनिराळ्या तऱ्हा, अनुष्का शर्माचं(जग्गू) पत्रकार म्हणून भेटणं, तिने एलियनची न्यूज स्टोरी म्हणून वापर करणं, त्यातून जुनेच पण नव्याने उभे राहणारे प्रश्न या सगळ्याची गुंफण लाजवाब झाली आहे. राजू हिरानीने स्वतःच एडिटरची कात्री हातात धरल्याने सिनेमाचा प्रत्येक सीन अगदी विचारपूर्वक तोडला आणि जोडला गेलाय. कुठेच छोटा देखील जंप कट जाणवत नाही. खुर्चीला खिळवून ठेवणारे एडिटिंग करण्यात तो यशस्वी झाला आहे. सिनेमा कुठेही रेंगाळणारा वाटत नाही उलट उत्सुकता वाढवतच जातो.
         कलाकारांचा अभिनय हि मोठी बाजू नेहमीच हिरानीच्या सिनेमाची शक्ती असते. बोमन इराणी, सौरभ शुक्ला, संजय दत्त, सुशांत राजपूत यांच्या भूमिका कमी लांबीच्या असल्या तरी त्या पूर्ण ताकतीने कलाकारांनी रंगवल्या आहेत. अनुष्का शर्मा हिची दुय्यम भूमिका असली तरी तिने ती उत्तम पेलली आहे. तिचा स्पेशल लूक सुद्धा भाव खावून जातो. विशेषतः अनुष्काने या सिनेमात आपली स्वतंत्र छाप सोडली आहे हे मान्य करावेच लागेल. राहिला तो आमिरचा प्रश्न. मि. परफेक्शनिस्ट हे वेगळचं रसायन आहे हे पुन्हा सिध्द झालं. त्याने नेहमीप्रमाणे आपल्या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत सहजपणे जाणवून येते. त्याचे डोळे आणि केवळ चेहऱ्यावरील हावभाव संपूर्ण चित्रपट व्यापून टाकतात. त्याचा तो चेहरा त्याला अप्रत्यक्षपणे सामान्य मानवापेक्षा वेगळा लूक मिळवून देतात. आपल्या कल्पनेतला एलियन नाही आणि अगदीच आपल्यासाराखाही नाही असा काहीसा PK साकारण्यात तो यशस्वी ठरलाय. आमिरचा सिनेमा म्हटलं कि मग साहजिकच त्याच्याकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात, या अपेक्षा तो तंतोतंत पूर्ण करतांना दिसतो.
         पण या साऱ्यांपेक्षा कौतुक करावेसे वाटते ते राजू हिरानीचेच. एक अफलातून कल्पना त्याने खूप विनोदी ढंगात दाखवली. चित्रपटातील सर्वात वेगळी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सध्याच्या समाज जीवनावर केलेले व्यंग! दिग्दर्शक म्हणून त्याने या विषयाला यशस्वी गवसणी घातलीच पण तो विषय त्याने कोळून प्यायला आहे असेच वाटते. आपल्या आजूबाजूच्या धार्मिक जीवनावर अत्यंत सफाईदारपणे टीका त्याने केली मात्र ती विनोदिशैलीत. हि गुंफण फार अवघड होती मात्र त्याने ती लीलया पेलली. अगदी हिंदू विधवा – पांढरारंग – ख्रिश्चन मॅरेज – फ्युनरल – काळा रंग – मुस्लीम महिलांचा बुरखा हा सारा कोलाज त्याने पडद्यावर शिताफीने मांडत बोचरी टीका सुद्धा केली. दुसर्या एका सीन मध्ये हिंदू देवेता – नारळ अगरबत्ती – येशू – वाईन – मस्जिद हा प्रवास करतांना आपल्या परस्पर विरोधी प्रथांना चिमटा काढायला विसरला नाही. हि सारी किमया त्याने विचारांची मोन्ताज पद्धत वापरून केली. ‘रॉंग नंबर’, ‘ठप्पा’ अशा विविध खोचक शब्दातून मानवाच्या धर्मातील विभाजनावर सणसणीत वार केलेत.
          मी सुरुवातीला म्हटल्या प्रमाणे त्याने या चित्रपटात वापरलेला ‘चष्मा’ हाच या चित्रपटाचा  आत्मा आहे. हा चष्मा म्हणजे आपल्याच समाजाकडे त्रयस्थ म्हणून एलियनच्या नजरेतून पाहणे. इथले धर्म, जाती, पंथ, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, अमूर्त विश्वास यांच्याकडे पाहण्यासाठी आणि आपल्याला ते दाखवण्यासाठी हा चष्मा वापरला. या चष्म्यातून पाहतांना हे सारे कसे धार्मिक थोतांड वाटते याची प्रचीती इथे येते. अगदी नोटेवरचे गांधीच फक्त महत्वाचे आणि इतर कुठल्याच कागदावरले गांधी महत्वाचे नाही हे सूचक वक्तव्य अत्यंत सहज व सुंदर पद्धतीने त्याने मांडले.
          निश्चितच हा सर्व प्रकार त्याने अत्यंत धाडसाने, अभ्यासाने व अपार कष्टाने मांडला आहे. प्रत्येक सीन मध्ये विनोदापलीकडे एक-एक गोष्ट त्याने अत्यंत मार्मिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त त्या विनोदामागची टीका ज्याला कळली आणि आपसूक तोंडातून वाह! शब्द बाहेर पडला, त्यालाच राजू हिरानीचा हा अफलातून प्रयत्न कळला. फक्त भीती एकच वाटते ती म्हणजे, त्याने समाजजीवनाच्या थोतांडावर केलेल्या भाष्यावरच्या विनोदी आवरनालाच जर प्रेक्षक भुलला तर मात्र त्याचा हा संदेश लोकांपर्यंत पोहोचणार नाही आणि इतका सुंदर प्रयोग केवळ मनोरंजन म्हणून उरेल. म्हणूनच मी त्याला ‘डायल केलेला परफेक्ट रॉंग नंबर’ म्हटले, फक्त लोकांनी नेमकेपणाने तो ‘रिसीव्ह’ करावा एवढीच त्याचीही आणि माझीही अपेक्षा....
           राजू हिरानीच्या या अफलातून प्रयोगाला सलाम.....

Wednesday, November 5, 2014

जातीवादाने बरबटलेला महाराष्ट्रीय जिहाद...

जिहाद म्हटला कि आपल्या डोळ्यापुढे येतो तो केवळ मध्य आशिया आणि त्यातील धार्मिक तेढ. पण जिहाद हा धर्म घटक नसून ती वृत्ती-प्रवृत्ती आहे हा विचारच आपल्याला शिवत नाही. आता तुम्ही म्हणाल कि असली जरी ही प्रवृत्ती तर त्याचा महाराष्ट्रात काय संबंध? इथे कुठे होतोय जिहाद? निश्चित इथे जिहाद होतोय. इथला जिहाद मुस्लीम समाज करत नाहीये, तर इथे जिहाद करतोय तो हिंदू समाज. नक्कीच मी बोलतोय ते केवळ धाडस नाही तर उघड सत्य आहे. खैरलांजी असो वा खर्डा किंवा आताच जवखेडा असो. इथे होणारे हत्याकांड नाहीत तर अमानुषपणे चाललेला हिंदू जिहादच आहे. जिहाद पुकारला जातो तो परधर्मीयांविरोधात, पण इथे मात्र हिंदू-हिंदू मध्येच या जिहादला तोंड फुटलं आहे. पुरोगामी आणि पुढारलेला महाराष्ट्र या गोंडस वाटणाऱ्या नावाखाली काहीकाळ छुपा आणि आता उघडपणे मांडलेला जातीवाद मूळ धरू लागला आहे.
जातीवाद संपला, आता कुठे शिल्लक राहिलाय जातीपातीचा प्रश्न असे आपण म्हणतो पण खरच तथ्य आहे का त्यात. जर असेल तथ्य तर का घडतायत या घटना. याचा विचार कोण करणार आहे? आपल्याला कुठे फरक पडतोय? याची झळ आपल्याला कुठे बसतेय? असेच जर प्रश्न पडत असतील तर आणखी एक प्रश्न स्वतःलाच विचारावा, मी याच समाजाचा भाग आहे कि आणखी कोणत्या? उत्तर तुमच तुम्हालाच सापडेल. मुळात या सगळ्याचे एकच उत्तर आहे ते म्हणजे इथल्या समाजाच्या घटकांमध्ये खोचून खोचून भरलेली बुरसट आणि मागास वृत्ती. माणसाला माणसाच्या नजरेने न पाहता, त्याच्याकडे जनावराच्या नजरेने पाहणं किंवा त्यहिपेक्षा नीच नजरेने पाहणं ही कोणती प्रवृत्ती? ही प्रवृत्ती आकाराला येऊन आता अनेक युगे उलटली पण तीच कुजलेली मानसिकता घेऊन आज एकविसाव्या शतकात थोबाड वर करून आपला समाज वावरतो आहे.
आर्य असणाऱ्या ब्राम्हणांनी जे ३००० वर्षांपासून पेरून ठेवलं तेच डोक्यावर घेऊन नाचणारा सवर्ण आजही दिसतोय यातच सगळं आलं. जातीपातीची फुशारकी मिरवर्यांना आपल्याच इतिहासाची माहिती नसली तरी आपण ब्राम्हणांपेक्षा कमी का असेना पण किमान दलितांच्या वरचढ आहोत यात जणू स्वर्गसुख वाटतं. हे फुटकळ स्वर्गसुख मिरवत आयुष्य घालावण्यातच धन्यता वाटावी यासारखे दुसरे हास्यास्पद काय असेल. आपला वास्तविक आगापिच्छा माहित असो ना असो मी सवर्ण आहे हे महत्वाचे ही भिकार मानसिकता अंगी बाळगण्यात कसलं आलंय शहाणपण? पण का हे विसरताहेत कि ज्यांच्यावर आपण हा अमानुष अन्याय करतो आहोत ते माझ्याच समाजाचे घटक आहेत किंबहुना माझ्याच रक्ताचा भाग आहेत आणि ज्यांची अक्कल आपण गेली अनेक वर्षे भाड्याने घेतली आहे ते रक्त मुळात परकं आहे. मात्र हे कसं मान्य होणार. ब्राम्हण म्हणजे देव यांना! देवाला दुखवून कसे चालेल बरे? ब्राम्हण कोप झालाच तर कुठे जावं? कोण वाली उरेल आम्हांस? ही यांची विचारसरणी. ज्याच्या नावावर हा जगाचा फुल शो चालवला जातो तो परमपिता ब्रम्हा जरी आला आणि त्याने विनवण्या जरी करून सांगितल्या तरी यांना ब्राम्हणांनी सांगितलेलं ज्ञानच पवित्र वाटेल. या असल्या सवयीमुळेच ब्राम्हणांनी आपल्या पोळ्या यांच्याच पाठीवर भाजल्या. आपली पाठ सोलपाटून निघाली याच काही नाही पण ब्राम्हणाच पोट भरलं यात सुख मानणारे हे सवर्ण.
नगर जिल्ह्यातच खर्डा येथे नितीन आगे नावाच्या कोवळ्या मुलाचा गुन्हा काय होता कि त्याला मरेपर्यंत मारले? तथाकथित उच्च वर्णीय मुलीसोबत प्रेम केलं हेच? एकाबाजूला असले भिकार विचार मनात ठेवायचे आणि दुसऱ्याबाजूला याच बड्या धेंडांना आपल्याच शेतात, ऊसात दलित स्त्रिया, मुली भोगायला चालतात. पोटाला रोजगार देतो म्हणून त्यांच्या गरिबीचा फायदा उठवतांना हा जातीपातीचा बाणा कुठं जातो? हे धंदे करतांना का आठवत नाही ‘मोडेन पण वाकणार नाही’ हा ताठर बाणा? आपल्या पोरीबाळींना तेवढी अब्रू असते आणि दलितांच्या अब्रू काय अशा उघड्यावर पडल्या आहेत का? पर जातीत प्रेम करणे जर यांच्या दृष्टिकोनातून गुन्हाच असेल तर मग ज्या सवर्ण मुलीसोबत त्याचे प्रेम होते तिला का जिवंत ठेवलीय? तिला नाही का शिक्षा देवू वाटत या न्यायवाद्यांना? का ती सवर्ण म्हणून पवित्र? त्या कोवळ्या जीवाला फासावर लटकवायला यांना लाज वाटू नये? सोनाई प्रकरणात कडबा कापायच्या कोयत्याने तुकडे करतांना कुठला पुरुषार्थ दाखवला गेला? खैरलांजी प्रकरणात शिक्षा सुनावल्यावर सुद्धा यांच्या चेहऱ्यावर आपल्याकडून गुन्हा घडल्याचा साधा भाव नसतो. आपण जणू लाज वाटण्यासारखे काही केलेच नसल्याचा आव आणणारे महाभाग हे. मानावतेसाठीची दया यांच्या अंगी नाही. जवखेडा मध्ये दलित कुटुंबावर अमानुष अत्याचार कुठल्या मानसिकतेने झाला? खून होणे ही जरी एक नेहमीची बाब असली तरी कटर ने देहाचे तुकडे करणे या अमानुष आणि बिभित्स वृत्तीला काय म्हणायचे? माणूस म्हणून जगण्यापेक्षा मग सरळ आम्ही सैतान आहोत हे जाहीर करा आणि मग असे वागा?
मुळात या सवर्णांचा अहं भाव दुखवायला लागल्यापासूनच या सगळ्या घटनांना सुरुवात व्हायला लागली आहे. काल परवापर्यंत दोन घास खायला न मिळणाऱ्या जातीचे आज प्रगती करतायत, आपल्या रांगेत कुठेतरी उभे राहतायत, आपल्या खांद्याला खांदा लावून समाजात वावरत आहेत हे डोळ्याला खुपायला लागलं आहे. गेली ३००० वर्षे तुम्ही आमच्या डोक्यावर पाय ठेवून नाचला तेव्हा हा विचार कुठे गेला होता? आता जरा कुठे दलितांचे पंख फडफडले तर लगेच त्रास व्हायला लागला? आता तर कुठे सुरुवात आहे तोवर ह्या घटना घडत आहेत जेंव्हा अगदी सगळ्यांच्या बरोबरीने हा दलित समाज प्रगती करेल तेव्हा काय उघड पणे चौकाचौकात तुम्ही मुडदे पाडत फिरालं. या सगळ्यात कपाळावर सद रक्षणाय खल निग्रहणाय असं मिरवत फिरणाऱ्या खाकीला तर सलाम! यांनी नेमकी कुणाच्या सरंक्षणाची शपथ घेतलीय ते कळतचं नाही. दलितांवर होणारे अन्याय यांच्या गावीच नसतात. एखादा दलित चोर यांना लगेच सापडतो मात्र दलितांवर अन्याय करणारे यांना आयुष्यभर सापडत नसतात. खैरलांजी प्रकरणात दबाव अनावर झाला म्हणून शेवटी न्याय देन भाग पडलं. मग बाकीच्या प्रकरणात का घडत नाही हे.
दलित चळवळी जरा कुठे डोक्यावर जाऊ लागल्या कि आता काय नवीन फंडा शोधून काढलाय, दलितांच्या चळवळीत नक्षलवाद्यांनी हात घातला आहे असं म्हटलं कि झालं. उठसुठ असे आरोप केले कि एक दिवस सगळ्यांना पटणार हे. परंतु आज घडणारे अन्यायी भ्याड हल्ले असेच होत राहीले आणि त्याविरोधात आवाज उठवणार्या दलित तरुणांना जर असेच नक्षलवादी संबोधले जाऊ लागले मग वैफल्यातून या समाजाने भविष्यात नक्षलवाद जवळ केला,  तर त्याला जबाबदार कोण असेल? हातात तंबाखू चोळत हे सारं पाहणारी आणि सामाजिक समानतेची 'थाप' मारणारी शासन व्यवस्था? या सगळ्यांच्या वर माध्यमे आपली जबाबदारी पार पाडतात. माध्यमांना पंतप्रधानांनी आज या रंगाचा सदरा घातला, त्या रंगाचे जाकेट घातले हे तासातासाला दाखवण्यात अधिक रस असतो, पण महाराष्ट्रात यांच्याच नाकाखाली उघडपणे ही अमानुष हत्याकांडे घडतात त्याच सोयरसुतक नसतं. एखादी बातमी दिली की संपल. तो मुद्दा लावून धरण्यात यांना घेनदेन नसतं. या सगळ्यात लढलं पाहिजे ते केवळ दलित चळवळींनी हा जणू प्रघातच पडला आहे. इथे सामान्य समाजाला याचे काही उरले नाहीये. मरणारा माझा कुणी नाही ना? मग मी कशाला उभा राहू ही मानसिकता. या हत्यांकडे केवळ दलित हत्या म्हणून न बघता, आपल्याच समाजातील घटकाची अमानुष आणि क्रूर हत्या म्हणून पाहिली तर जाणिवा जिवंत आहेत समाजाच्या असं म्हणता येईल.
पण एक मात्र खरे इथून पुढे महाराष्ट्राने पुरोगामी आणि आधुनिक महाराष्ट्र असले झेंडे घेऊन वाटचाल करू नये आणि असली विशेषणे सुद्धा लावून मिरवू नये. उठसुठ असा खुलेआम एक समाज दुसऱ्या समाजाचे गळे चिरत असेल आणि त्याला कारण केवळ आणि केवळ जातपात असेल त्याला काय अर्थ उरतो. आपल्याच मातीतल्या मानव नावाच्या श्वापदांचे हे अमानुष आणि किळसवाणे उद्योग पाहून ना त्या शिवरायांना बरं वाटत असेल ना आंबेडकरांना आपण समानता मिळवून दिली याचं समाधान मिळत असेल. पण इथल्या कर्म आणि बुद्धीने दरिद्री समाजाला कोण समजावणार? इथे जातीची मिजास प्यारी. मानातल्या मनात अजूनही इथे अस्पृश्यता जपलेलीलीच आहे हे आता उघड आहे. शासनाने सुद्धा आता हा समानतेचा झेंडा खाली उतरवावा मग हे सारे हल्ले बांगड्या भरून सगळ्या समाजाने डोळे भरून पाहत बसावे. तो शोभेल माझा निधड्या छातीचा आधुनिक महाराष्ट्र. जय पुरोगामी महाराष्ट्र!

Saturday, October 18, 2014

समाधानाने भरलेला सिनेमा....

       हल्ली चित्रपट पहिला कि उर समाधानाने भरावा असे चित्र अत्यंत दुर्मिळच. आजचा चित्रपट हा ‘सिनेमा’ या व्याख्येला कमी आणि ‘व्यवसाय’ या व्याख्येला अधिक जवळ करतो. आजच्या सिनेमाचे हे रूप पाहता केवळ बॉक्सऑफिस वर ‘गल्ला’ जमणारा सिनेमा म्हणजे ‘यशस्वी’ सिनेमा हे समीकरण व्हायला सुरुवात झाली आहे. मग भीती वाटू लागते कि काय असेल सिनेमाच भवितव्य?. अभिजात दृष्टीने सिनेमाकडे पाहणं संपून जाईल का? मुळात असे सिनेमे निर्माण तरी होतील का? या कलाकृतीतून समाजाला काहीतरी देता येईल का? कि केवळ ‘शतकी करोड क्लब’च्या खाणखणाटात अभिजात सिनेमा दडून जाईल? असे नानाविध प्रश्न उभे राहतांना एक सिनेमा येतो आणि या प्रश्नांना छेद देऊन जातो. अर्थात तो सिनेमा म्हणजे डॉ. प्रकाश बाबा आमटे.
सिनेमा काय आणि कसा आहे हे ठरवतांना प्रामुख्याने जे निकष आपण लावतो ते अत्यंत महत्वाचे असतात. मुळात एक सिनेमा जेव्हा प्रेक्षकांसमोर येतो तेव्हा तो काहीच लोकांना समाधान देवून जातो. मात्र हा सिनेमा निर्मात्याला, दिग्दर्शकाला, त्यातील कलाकारांना आणि सिनेमा पाहणाऱ्या प्रेक्षकांना सर्वांनाच एकाचवेळी समाधान देतो. प्रेक्षक सोडून इतरांना हे समाधान कि आपण काहीतरी प्रेक्षकांना देऊ शकलो आणि प्रेक्षकांना हे समाधान कि इतक्या अथांग सागराला प्रत्यक्षात नाही मात्र पडद्यावर थोडे तरी अनुभवता आले. हा सिनेमा बनवतांना डॉ. आमटे आणि कुटुंबीयांची मानवतेसाठीची धडपड लोकांसमोर यावी हाच हेतू होता. त्यामुळे जर या चित्रपटाद्वारे ते शक्य झाले तरच हा सिनेमा उत्तम असा निकष इथे लागू होतो. मुळात असे प्रासंगिक निकष प्रत्येक चित्रपटासाठी लागू होतात. या सिनेमात अखेरच्या प्रसंगात डॉ. आमटे जेंव्हा मंदाताईंना विचारतात कि तुला काय मिळालं माझ्या सोबत राहून? तेव्हा त्या म्हणतात कि ‘जगण्याचं समाधान!’. त्याचं उत्तर म्हणजे जणू त्यांच्या आणि अर्थात आपल्याही आयुष्याचे सार सांगून जातो.
सिनेमाची सर्व बाजूंनी भट्टी चांगली जमवली आहे. मुख्य म्हणजे चित्रपटाची कथा ही अशी आहे कि चित्रपट केवळ या कथेवर सहज चालू शकतो. डॉ आमटेंचे कार्यचं इतकं मोठ्ठ आहे आणि ते पडद्यावर आणखी भव्य दिसतं. समृद्धी पोरेंना अपेक्षित असलेला सिनेमा त्या पहिल्या प्रयत्नातच बनवू शकल्या हे कौतुकाच आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांनी अत्यंत व्यवस्थित पार पडली. चित्रपट ज्या प्रमाणे मनाला आनंद देतो तसाच पाहतांना देखील डोळ्याला आनंद देतो. महेश अन्ये यांनी सिनेमेटोग्राफीची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. चित्रपटातील दृश्ये भावनाप्रधानतेला महत्व देणारी वाटतात. अशा सिनेमात सिनेमेटोग्राफीत अनेक वेगळे प्रयोग करण्याचे धाडस देखील त्यांनी केले. सिनेमाचे संवाद ही खरेतर सगळ्यात जमेची बाजू म्हणता येईल. काळजाला हात घालणारे संवाद या सिनेमात अत्यंत कुशलतेने पेरले आहेत. अनेकदा प्रसंगाची गंभीरता एका उच्च पातळीवर नेवून ठेवणारे संवाद यात दिसतात तर दुसर्या बाजूला गंभीर वातावरणात मिश्किलपणे हास्य देखील उमटवणारे संवाद सापडतात. विषयाची व्याप्ती अर्थात मोठ्ठी असल्याने ते शक्य झाले असावे.
अखेर बाजू राहते ती अभिनयाची. अर्थात नाना पाटेकर पडद्यावर असतांना आपण इथे कुठेतरी फुटपट्टी घेऊन सांगण म्हणजे मूर्खपणाच ठरेल. अपेक्षेपेक्षा अधिक प्रभावी बाबा आमटे पडद्यावर उतरवण्यात नाना यशस्वी झाला आहे. चित्रपटातील नेगेल या बिबट्याच्या मृत्युवेळचे दृश्य नानाने भलत्याच ताकतीने पेलले. त्या दृश्यातील त्याचा बाज हा डॉ आमटे आणि नाना दोन वेगळ्या व्यक्ती आहेत हे विसरायलाच लावतो. नेगेल जणू आपलेच मूल आहे असा तो आक्रोश त्याने जिवंत साकारला. दुसरी बाजू म्हणजे सोनाली कुलकर्णी. सोनालीने आजवरच्या आयुष्यातील सगळ्यात आव्हानात्मक भूमिका बजावली असे वाटते. मंदाताई साकारण्यात ती यशस्वी  झाली आहे. काही प्रसंगात नानाला मागे टाकण्याची किमया तिच्याकडून यंदा घडली. मुलगी आरतीला घेऊन जाण्याचा प्रसंगात तिने एका आईला अक्षरशः जिवंत केले असेच म्हणावे लागेल.

चित्रपटाच्या सुरुवातीलाच मांडलेले नक्षलवादाचे चित्र अत्यंत चपखल बसले आहे असे म्हणता येईल. तेथील आदिवासींची भ्रष्ट अधिकार्यांकडून होणारी पिळवणूक काळजाचा ठाव घेऊन जाते. भव्यता दाखणारे दृश्य पडद्यावर उतरवण्यात पोरे यशस्वी ठरल्या आहेत. एकूण पाहता सिनेमा तांर्तिक बाबतीत तितका गरुडझेप घेत नसला तरी तो सिनेमा म्हणून सर्व आघाड्यावर यशस्वी वाटतो. तांत्रिकदृष्टीकोनाची मोजपट्टी इथे लावणे योग्य नाही हे जगजाहीर आहे. उत्तम सिनेमा म्हणूनच याच्याकडे पाहावे असे वाटते.
 

Tuesday, September 23, 2014

काही केल्या ‘कावळा’ काय शिवेना....




विधानसभा निवडणुकीची उत्सुकता ही लोकसभा निवडणुका संपल्या आणि निकाल लागले तेव्हा पासून लागून राहिली होती. आजवर पक्षांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना हुरहूर लागत असे मात्र यंदा सामान्य जनतेला देखील ही हुरहूर लागून राहिली आहे. ज्याला त्याला जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी केवळ निवडणूक, निवडणूक आणि निवडणूक दिसतेय. जो तो उठतोय आणि याच धुळीत पडतोय. लोकसभा संपली आणि तिचा निकाल आला तेव्हा बऱ्याच प्रस्थापित मंडळींना घरात बसावे लागले. अर्थात महाराष्ट्राचा विचार केल्यास त्यावेळी सत्तास्थानी असलेल्या मात्तब्बरांना धोबीपछाड मिळाला. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची खूपच वाताहत झाली. त्यामुळे मतदार राजाला खरोखर आपण राजा झालो असा काहीसा 'फिल' झाला. हा निकाल अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरला त्यामुळे तिथूनच आगामी निवडणुकांचे (विधानसभा) पडघम वाजायला सुरुवात झाली. महायुतीची नवी मोट चालवणाऱ्यांनी त्याचवेळी विजयाचे बिगुल वाजवून दिले. आमचाच विजय पक्का अशी आरोळी सुद्धा ठोकून दिली.
हे काहीसं कमी होत असं वाटून इलेक्ट्रोनिक माध्यमांनी लोकसभा संपताच विधानसभेच्या निकालासाठी सर्व्हे सुरु करून टाकले आणि आपला 'टीआरपी' बाजार मांडून टाकला. चार मतदार संघांचा सर्व्हे करून पंधरा मतदार संघांचे निकाल जाहीर करून मोकळे झाले. वास्तवतः पहिले तर नॅशनल स्टॅटिकल ऑर्गनायझेशनला देखील आश्चर्य वाटावे इतक्या जलद गतीने सर्व्हे पूर्ण झाले. कुठल्या वाहिन्यांनी कुणाला विजयी केले आणि विजयी पताका हातात देवून मोकळे झाले हे तर आपण सगळ्यांनी पहिले. आता प्रश्न उरतो तो असा कि एवढे सगळे होवून गेले तर मग आघाडी से बिघाडी, महायुती से महातुटी चे प्रश्न का उभे राहतायत? जर विजय निश्चित मानायचा तर भांडण कशासाठी? उद्या विजयाचे श्रेय कुणाला यासाठी? कि सत्ता कुणाच्या हातात एकवटणार यासाठी? मुळात आम्हाला सत्ता नकोय आम्ही फक्त जनतेच्या भल्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी विजयी होऊ अशा एकीकडे दिवन्ड्या पिटायच्या आणि इथे घरात तुझी आमदार जास्त का माझी आमदार मंडळी जास्त यावर खलबती करायच्या. मग उगीच जनतेच्या कळवल्याचा खोटा भाव कशाला आणायचा?
पण मित्रांनो राजकारणातील गणितं जरा वेगळी असतात. जागावाटपाचा तिढा दिसतो तेवढा अवघड नाही, सोपाच आहे फक्त चालू आहे तो महाराष्ट्राला 'उल्लू बनाविंग' प्रोग्राम. हा गेला पंधरवडा म्हणजे नेमकं काय तर "पितृपक्ष". या कालावधी मध्ये आपले पूर्वज जे वर्षभर उपाशी असतात ते कुठून कुणास ठाऊक येतात आणि अगदी 'गुगल मॅप्स' वर पत्ता शोधावा तसे नेमके घर शोधून आपल्या घरावर येऊन बसतात. मग आपण त्यांना ठराविक पद्धतीने ठरलेला भोजन ग्रहणाचा आनंद द्यायचा, तृप्त करायचे आणि निरोप घ्यायचा. ही आपली परंपरा. पण तुम्ही म्हणाल कि याचा इथे काय संबंध? तर या सर्व प्रकाराव्यातिरिक्त पितृपक्षाच्या कालावधीत कुठलेही शुभकार्य करू नये, नवीन जमीनजुमला, व्यवहार मार्गी लावू नये, नवी 'इन्व्हेस्टमेंट' करू नये असे नियम असतात म्हणे. मग मला सांगा महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि भविष्यासाठी आखली जाणारे 'भागीदारी'चे व्यवहार या काळात करून कसे चालेल. अशुभ नाही का ठरायचे ते? अहो सत्ता मिळवायची आहे? सुरुवातीलाच असे अशुभ वातावरणात डाव मांडले तर पुढे पाच वर्षे कसे चालायचे? म्हणून हा तिढा काहीसा वाढला. पण तो काही पक्षांच्या हितासाठी नाही. हे सार घडलं केवळ महाराष्ट्राच्या भल्यासाठी. अशुभ पायावर 'आधुनिक' महाराष्ट्राचा विकास अशुभ ठरला तर? चालेल का तुम्हाला? नाही ना. म्हणून तुमच्या आमच्या काळजीपोटी झालेला हा जागावाटपाचा तिढा आहे आणि आश्चर्य म्हणजे २००९ च्या विधानसभा निवडणुका पितृपक्षातच आल्या होत्या तेव्हा देखील उमेदवारी अर्ज हा कालावधी संपल्या नंतरच भरले गेले होते. शेवटी देशातील अग्रेसर आणि आधुनिक राज्य आहे आपलं!
यात आणखी एक महत्वाचे म्हणजे 'उल्लू बनाविंग प्रोग्राम पार्ट टू'. दारुड्या लोकांना दारू पिल्यावर जोम अंगात चढतो. जोम वाढला कि मग बायकोला दणादण मारहाण सुरु होते. हा कलकलाट वाढला कि शेजारी पाजारी गोळा होतात त्याबद्दल हळहळ व्यक्त करतात, शेवटी भांडण थांबवायला शेजारी सरसावतात. पण हे पाहून दारुडा अधिकच जोमात येतो आणि आपला खेळ चालू ठेवतो, हा प्रकार काहीसा पब्लिसिटी स्टंटचा आहे. बघा ना तुम्हीच. आता लोकसभा संपल्यापासून यांनी राज्यात आणि केंद्रात केवळ युती असणार हे जाहीर करून टाकले. मग मतदानाला २०-२५ दिवस शिल्लक राहायची वेळ आली तरी यांचे जागा वाटप निश्चित होईना? इतकं टोकाला जाईल का हो हे? महिनाभर जागा वाटपाचा तिढा अशा बातम्या सोडून दिल्या आणि मग काय अखंड महाराष्ट्रात चर्चेची गुर्हाळ सुरु झाली. लोकांना हळहळ वाटू लागली. अरेरे युती तुटायला नको बाबा अशी प्रत्येकजण कॉमेंट करत होता. महायुती तुटली म्हणजे मग आयुष्यचं संपलं अशा अविर्भावात दुखी होऊ लागले. झालं जे हवं होतं ते मिळालं अवघा महाराष्ट्र महायुतीमय आधीच करून टाकला. आता अपेक्षित मतदानाची आणि निकालाची फक्त वाट पहायची.

  या चारही पक्षातील एकही पक्ष स्वबळावर लढायची धमक दाखवू शकत नाही. फक्त बाता मारायला पुढे आहेत. शेवटी यांना एकमेकांशिवाय आधार नाहीच. हातात येणारी सत्ता महायुतीला सोडू वाटेल का हो? अहो ज्याची गेली १५ वर्षे वाट पहिली तो घास हातातोंडाजवळ आला असताना कुणी धुडकावेल का? इकडे आघाडीला आपलाच १५ वर्षांचा प्रताप माहित आहे पण युतीचे तीन तेरा वाजावे आणि आपला ‘चान्स’ वाढावा एवढीच माफक अपेक्षा. पण आता केवळ प्रश्न उभा राहतो तो हा कि या सगळ्यामागे काय तर पितृपक्ष आणि मुहूर्त? आता महायुतीची विचारसरणी पाहता हे उघड आहे कि आता हे पंचांग पाहणार, मुहूर्त पाहणार आणि मग आपला विकास करणार. आपण अपेक्षा ठेवायची कि अंधश्रद्धेला आयुष्यभर विरोध करणाऱ्या डॉ. दाभोलकरांना हे दोन्ही सरकारे न्याय देणार. शेंबडं पोरगं देखील याचं उत्तर देईल. पण आम्हा सुजाण जनतेला याची अक्कल केव्हा येणार हे कुणास ठाऊक. एकीकडे फुले, शाहू आंबेडकरांचे नाव घेवून राजकारण करायचे आणि अशा अनिष्ट रूढी परंपरांना धरून बसायचं. हे असे ढोंगी पक्ष आहेत सारे. इथे प्रत्येकाला आपली खुर्ची आणि सत्ता प्यारी आहे. जनतेची कळकळ हे केवळ थोतांड आहे. आता फक्त वाट पहायची कि हा सारा गोंधळ उघडपणे पाहून शहाणा मतदार या ढोंगी पक्षांना उल्लू बनवतो कि या पक्षांकडून जनतेला नेहमी प्रमाणे उल्लू बनाविंग चालू राहते.