Thursday, May 7, 2020

Ajanta: In the peace with Buddha...

Ajanta Caves
              The Ajanta Caves are 30 rock-cut Buddhist cave monuments which date from the 2nd century BCE to about 480 CE in Aurangabad district of Maharashtra state of India.  The caves include paintings and rock-cut sculptures described as among the finest surviving examples of ancient Indian art, particularly expressive paintings that present emotions through gesture, pose and form.
            According to UNESCO, these are masterpieces of Buddhist religious art that influenced the Indian art that followed.  The caves were built in two phases, the first phase starting around the 2nd century BCE, while the second phase was built around 400–650 CE, according to older accounts, or in a brief period of 460–480 CE according to later scholarship. The site is a protected monument in the care of the Archaeological Survey of India, and since 1983, the Ajanta Caves have been a UNESCO World Heritage Site



















  
  

  
  
 
    

 

Thursday, July 27, 2017

अंतरात्म्याचा अजब योगायोग



आजुबाजूच्या माणसांवरचा विश्वास उडाला की माणूस आपल्यातल्या आत्म्याला गोंजारायला सुरु करतो. अनेक प्रश्न तेंव्हा सुया बनतात आणि आतल्या आत्म्याला टोचायला लागतात, अशावेळी तो जे म्हणेल, तो जे सांगेल त्यावर विश्वास ठेऊन माणूस कृती करतो. तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाचं हे असं गणित असतं. पण राजकारण्यांमधला अंतरात्मा जरा हटके असतो. त्यांचा अंतरात्मा त्यांच्या आत नसतोच, तो कधी आजूबाजूला, कधी डाव्यात, कधी उजव्यात, कधी या पलीकडेही, तर कधी विरोधी पक्षातही असतो. उदाहरणार्थ अगदी ताजी घटना म्हणजे तत्ववादी राजकारणी आणि बिहारचे (परवा संध्याकाळी तीन तासांपुरते) माजी आणि तिथून पुढे पुन्हा आजी मुख्यमंत्री नितीशकुमार. हे असतात बिहारच्या पाटण्यात आणि यांचा अंतरात्मा दिल्लीतल्या प्रधानसेवक कार्यालयात आहे. यादवांच्या छळाने गदगदून गेलेल्या नितीशकुमारांनी अंतरात्म्याचा सल्ला ऐकत राजीनामा दिला आणि बिहारच नव्हे तर देशभरात राजकीय भूकंप घडवून आणल्याच्या बातम्या वृत्तवाहिन्यांवर धडाडू लागल्या.
      वास्तविक हा राजकीय भूकंप होता की नाही याबाबत अनेक मते आहेत. कारण हा केवळ सामान्य जनतेसाठी आणि या जनतेला दाखवायचा म्हणून माध्यमांसाठी (दिखाऊ) भूकंप होता. अन्यथा राजकीय अभ्यासक, विश्लेषक, माध्यमातले अनेक राजकीय पत्रकार, संपादक आणि खुद्द तमाम राजकारणी यासगळ्यासाठी ग्राह्य असलेली घटना होती. जनता सोडता वरील प्रत्येक घटकाला ही राजकीय भाकरी फिरणार हे अठरा महिन्यापूर्वीच माहित होते. हो अगदी अठरा महिन्यांपूर्वीच हे उघडपणे दिसत होतं की आज ना उद्या गठबंधन तुटणार. अठरा महिन्यांपूर्वी बिहारच्या निवडणुकांमध्ये जनतेने देशभर उसळत असलेली मोदी लाट परतवत तगडा निकाल दिला. या निकालाच्या बळावर ७१ आमदारांसह जदयु नेते नितीशकुमार मुख्यमंत्री म्हणून खुर्चीत स्थिरावले. त्यांची मुख्यमंत्रीपदी पाचव्यांदा वर्णी लागली होती. सत्ता स्थापनेसाठी लागणारी आकड्यांची जुळवाजुळव लालू यादवांच्या राजद आणि कॉंग्रेस (राहुल गांधींची कॉंग्रेस म्हणावं की नाही? हेच कळत नाही) या दोन पक्षांना घेऊन केली. लालूंकडे ८० आमदार संख्या असतांनाही मुख्यमंत्री पदावर पाणी सोडावं लागलं.
      कशी बशी सत्ता स्थापन झाली परंतु या निवडणुकीकडे मागे वळून पाहिलं तर अगदी धक्कादायक चित्र दिसतं. आज भाजप आणि संघाच्या कडेवर जाऊन बसलेले नितीशकुमार मुख्यमंत्री झाले ते नेमक्या उलट गणितावर. हे गणित म्हणजे बिहार भाजपमुक्त नारा. निवडणुकीमध्ये भाजपमुक्त बिहारचे स्वप्न दाखवली आणि जनतेने त्या मुद्द्यावर यांना मते दिली. हिटलरशाही, धार्मिक तेढ बिहार मध्ये नको असे बाण मारत, भाजपला नामोहरण (भक्तांनो नमोहरण नव्हे) करत त्यांनी बाजी मारली. पण ती केवळ अठरा महिन्यांपुरतीच. अठरा महिन्याच्या संसाराचा काडीमोड करत, नवा संसार थाटला गेला. कारण केवळ एकच (तेही नितीशकुमारांनी माध्यमांमध्ये सांगितलेलंच) लालूंचे सुपुत्र तेजस्वी यादवांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप. तेजस्वी हे बिहारचे उपमुख्यमंत्री, भ्रष्टाचार हा कौटुंबिक वारसा त्यांनीही जपून ठेवला त्यात नवल ते काय? यादव कुटुंब (लालूंचे) आणि घोटाळा हा जणू समानार्थी शब्द आहे असेच वाटते. यादव राजीनामा देण्याची सुतरामही शक्यता नाही हे कारण पुढे करत नितीशकुमार पायउतार झाले. बरं गम्मत ही की माझ्या तत्वानुसार भ्रष्टाचारी लोकांच्या सरकार मध्ये मला माझी तत्वे राहू देत नाहीत म्हणून मीच वेगळा होतो अशी आवई उठवत पद सोडले. पण प्रश्न हा की घोटाल्याच हे प्रकरण २००४-२०१४ या दरम्यानच, म्हणजे अठरा महिन्यापूर्वीच्या सत्ता स्थापनेआधीच, आरोप तर तेव्हापासून होते. म्हणजे लालू रेल्वेमंत्री होते तेव्हा पासून. पण गठबंधन करतांना यांची भ्रष्टाचार विरोधी तत्वे कदाचित स्लीपिंग मोड वर असावीत किंवा त्यावेळी तत्वे सायलेंट केली असावीत. कारण तेव्हा मुख्यमंत्रीपद मिळवणं केवळ यादवांना जवळ केल्याशिवाय शक्य नव्हतं. मग आजच हा सायलेंट मोड जाऊन लाउडस्पीकर मोड का घेतला?
      खरतरं हा अचानक आलेला यु टर्न नाही, या सिनेमाचं पटकथा लेखन तीन-चार महिन्यापासून सुरु झालेलं. प्रचारात घेतलेली भाजप विरोधी भूमिका बदलत, सत्ता भाजप सोबत स्थापन करणे तेव्हा अशक्य होते. म्हणून रडत खडत संसार सुरु केला. दरम्यान त्या काळात भाजप सोडून काँग्रेस आणि डाव्या विचारसरणीच्या सर्व नेत्यांना २०१९ च्या निवडणुकांमध्ये मोदीविरोधी आघाडी निर्माण करत रणनीती आखायची होती. यातला मोदींचा पर्यायी चेहरा म्हणून नितीश एकमेव उत्तर या महाआघाडीकडे होते. त्या दिशेने मोट बांधायचं काम देखील सुरु होतं. नितीशकुमारांची पंतप्रधान पदाची महत्वाकांक्षा कधीही लपली नव्हती, याचाच फायदा इतर पक्षांना आणि खुद्द नितीशकुमारांनाही घ्यायचा होताच. परंतु हळूहळू भाजपमय होत जाणारा भारत आणि आपल्या वयाची चाहूल लक्षात घेत नितीशकुमारांना ते पद आवाक्याबाहेरच वाटू लागलं. २०१९ ची मोदी आणि भाजपची दावेदारी मजबूत होण्याची चिन्हे दिसतांना त्यांच्यातला खुर्चीत जगणारा आत्मा थोडासा डळमळू लागला. बर दुसरीकडे बिहारमध्ये पुढच्या वेळी लालू मुख्यमंत्रीपद नितीशकुमारांकडेच ठेवतील याची शक्यताही धूसर वाटू लागली. ना घर का न घाट का अशी परिस्थिती ओढवेल की काय अशी भीती देखील त्यांना वाटू लागली. दिल्लीतलं सिंहासन नसेना पण भाजप सोबत चूल मांडत किमान बिहारचे सिंहासन आपण पुढच्याही निवडणुकांमध्ये कायम राखूया या सात्विक भावनेने त्यांना पछाडलं.
      एकीकडे संपूर्ण भारत भाजपमय होत असतांना बिहार हातातून गेल्याचं दुःख मोदी-शहांना स्वस्त बसू देण शक्यच नव्हतं. काहीही करून इथे परिवर्तन आणणं गरजेचं वाटू लागलं. यातूनच मग पडद्यामागे साटेलोटे, घोडेबाजाराच्या बैठका घडू लागल्या. राजकारणात सत्ता मिळवण्यासाठी सर्व मार्ग वापरावे लागतात, तेच होऊ लागलं. यात भर म्हणून टाईम्स नाऊ मधून एक्झिट घेतलेले अर्णव गोस्वामी यांच्या नव्या रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीची रचना झाली. या वाहिनीच्या मालकी हक्कात एक भाजप खासदार आपला आधार लावून होते, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण अर्णव गोस्वामी आणि भाजप खासदार एकत्र म्हणजे पूर्वेचा सूर्य पश्चिमेला असाच अर्थ. या वाहिनीचा पहिलाच शो म्हणजे एक बॉम्बस्फोट होता (हा योगायोग म्हणावं की शुभारंभयोग), लालू आणि कुविख्यात शाहबुद्दीन यांच्यातील संभाषणाच्या रेकॉर्डिंगचे भांडवल करत लालूंचे वस्त्रहरण करण्यात आले. खरतरं त्याच दिवशी माझे सहकारी पंडित आणि माझे बोलणे झाले की लालूंची गेम सुरु झाली. भाजपप्रणीत ही खेळी नितीशकुमारांना काहीच माहित नव्हती असे समजणे अत्यंत बावळटपणा ठरेल. दरम्यान मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर असा खेळ जदयु आणि भाजप यांत सुरु झाला. लालुंमुळे बिहार आणखी खराब होतोय, क्राईमरेट वाढत जातोय, लालूंनी महत्वाची आठ खाती स्वतःकडे ठेवलीय अशा एक ना अनेक आरोळ्या भाजपने ठोकायला सुरुवात केली, यात मध्येच पुन्हा चारा घोटाळ्याच्या केसला हवा दिली गेली, मध्येच लालूंच्या घरावर सी.बी.आय.चे छापेमार सुरु झाली. आयआरसीटीसीच्या दोन हॉटेलची केस नव्याने चघळली जाऊ लागली. इतके सारे घडत असतांना नितीश मात्र स्वस्त बसून होते, ते केवळ वाट पाहत होते योग्य वेळेची. (आणखी एक योगायोग) मागच्या आठवड्यात ईडी आणि सीबीआय ने १२ ठिकाणी छापे टाकत लालूंची पुरती नाकेबंदी करून टाकली आणि हीच योग्य वेळ साधत नितीशकुमारांनी आपले शस्त्रे बाहेर काढली. तेजस्वी यादवांचा बहाणा करत सरकारमधून काढता पाय घेतला.
      बिहारच्या भल्यासाठी या गोंडस नावाखाली या घटनेला कुरुवाळू लागले. त्यांनी राजीनामा दिल्या दिल्या ट्विटरचे जगातील सर्वोत्तम वापरकर्ते आणि प्रधानसेवक नरेंद्रजी मोदी यांनी नितीशकुमारांचे ट्विटरवरून अभिनंदनही करून टाकले. भ्रष्टाचाराविरुद्ध लढाईचे कौतुक केले आणि एका अर्थाने आपला नितीशकुमारांना, (नव्या सरकारला?) पाठिंबा जाहीर केला. नितीशकुमारांना भ्रष्टाचाराचा खूप तिटकारा आहे असा समज कृपया करून घेऊ नका. त्यांचेच गुरु जॉर्ज फर्नांडीस यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तेव्हा त्यांना अंतरात्म्याचा आवाज ऐकू आला नाही. शिवाय लालूंच्या गुंडप्रवृत्तीचे शाहबुद्दीन खासदारांचे वावडे असणाऱ्या नितीशजींना आपल्याच पक्षातले तमाम जवळचे सगेसोयरे गुंड नेते चालतात हा निराळाच योगायोग. त्यामुळे त्यांचा अगदी स्वच्छ प्रतिमेचा उदोउदो हा केवळ बनाव आहे. लालू, भुजबळ आणि असे विरोधी पक्षातील भ्रष्टाचारी नेते या सर्वांसाठी अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारी (आणखी एक योगायोग) ईडी आणि सीबीआय मात्र मध्यप्रदेशातील व्यापम भ्रष्टाचाराची, राजस्थानच्या वसुंधराराजेच्या भ्रष्टाचाराची कित्येक महिने केवळ चौकशीच करते. इथे मात्र प्रधानसेवक गप्प राहणे पसंत करतात. भाजप वर होणारे भ्रष्टाचाराच्या आरोपांना पत्रकारांसमोर सोडाच पण त्यांच्या ट्विटर वरूनही कधी उत्तर दिले नाही. मात्र नितीशकुमारांच्या भ्रष्टाचाराविरोधी लढ्याचे अभिनंदन तेवढे गडबडीत केले. हमारा भ्रष्टाचार तुम्हारे भ्रष्टाचार से छोटा हे दाखवण्यात सध्या भाजप व्यस्त असल्याने कदाचित त्यांचे लक्ष नसावे. तत्पूर्वी मोदींच्या नोटबंदी सारख्या अनेक निर्णयांना जाहीर पाठिंबा देत, आपली छुपी मनीषा त्यांनी जाहीरच केली.
      सगळ्यात मोठा योगायोग म्हणजे परवा संध्याकाळी नितीशकुमारांनी केलेल्या राजीनाम्यावरील सहीची शाई वाळते न वाळते एवढ्यात, अवघ्या अर्ध्या तासांत भाजपचे आमदार संख्याबळ जमवण्यासाठी थेट नितीशजींच्या निवासस्थानी गोळा झाले. कदाचित जगाच्या पाठीवर कुठे घडेल न घडेल असा अजब राजकीय योगायोग पुढे घडला. राजीनामा दिल्यानंतर अवघ्या तीन तासात नितीशकुमारांनी भाजपच्या पाठींब्याने नवीन सरकार स्थापनेचा दावा राज्यपालांना सादर केला. अवघ्या तीन तासात बिहारचे जदयु-राजद-कॉंग्रेस सरकार हे जाऊन त्याजागी बिहारचे जदयु-भाजप सरकार प्रस्थापित झाले आणि काही तासांत ‘अर्थ’पूर्ण सलोखा जपणाऱ्या वृत्तवाहिन्या बिहारचा नवा एक्झिट पोल घेऊन उभ्या राहिल्या. नितीशकुमारांनी घेतलेला निर्णय बिहारी जनतेला किती योग्य वाटतो याचे विश्लेषणकरू लागल्या. माध्यमांना हाताशी धरत होत्याच नव्हतं करण्यात पटाईत झालेल्या भाजपला हा खेळ अवघड तो काय?   
      नितीशकुमारांचा हा प्रताप काही नवा नाही. समाजवादी विचारसरणीच्या बुरख्याखाली त्यांची सत्तालालसा वृत्ती नवी नाही. यापूर्वीही समाजवादी झेंडे खांद्यावर घेवून एनडीए ला पाठिंबा दिला आणि रेल्वे मंत्रिपद खिशात घातले होते. जदयु चा वारसा त्यांनी पुढे चालवला. याधीही त्यांचेच गुरु जॉर्ज फर्नांडीस यांनीही समाजवादी बुरख्यात हेच केले, त्यांचेही गुरु लोहिया यांनी जनसंघाला सोबत घेत बडी आघाडी नावाखाली अजब समाजवाद जोपासला. त्यामुळे समाजवादी चेहऱ्याचे ढोंग करत धर्म आधार मानणाऱ्या संघाच्या ताटाला ताट लावत सत्तेच्या पंगतीत जाण्याचा प्रताप त्यांनी वारसाहक्काने कायम ठेवला एवढंच. फक्त यंदा त्यांना तत्वाविरोधात सत्तेत न बसण्याचा, (कदाचित गो-अमृत शिंपडलेला) पवित्र सल्ला आणि आमंत्रण देणारा अंतरात्मा त्यांच्या आत नव्हता तर हा अंतरात्मा दिल्लीस्थित प्रधानसेवक कार्यालयात होता इतकाच काय तो योगायोग.

Monday, April 3, 2017

माझा बाबूमोशाय श्रीपाद...




सगळं काही ठीक सुरु असतांना त्यादिवशी अचानक अभिजित देवकुळेचा फोन आला. खरतरं अभिजित म्हणजे माझा मास कम्युनिकेशनचा बॅचमेट. मास कॉम होऊन आता जवळ जवळ ४ वर्षे उलटली होती. फोन उचलला आणि अभिजित सरळ म्हणाला ‘’श्रीपाद अॅडमीट आहे मुंबईत, ब्लड कॅन्सर झालाय.’’ कानावर विश्वास बसला नाही. खर्चासाठी थोडी मदत करायची म्हणून सगळ्यांचे प्रयत्न सुरु झाले. तिकडे मुंबईत अभिजित सोबत अभि झांबरे, दिपक नारनवर आणि उत्तम पोवार मुख्यमंत्री निधीतून काही आर्थिक मदत मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. शुक्रवारी मीटिंगमध्ये असतांना अचानक श्रीपादचा फोन आला. मनात असूनही फोन उचलू शकलो नाही, सलग चारवेळा त्याने फोन केला पण बोलता आलं नाही. शनिवारी कॉलेजमध्ये असतांना त्याला फोन करायचा म्हणून नंबर डायल केला, रिंग होते तोवर एक गृहस्थ मला भेटायला आले आणि मला फोन कट करावा लागला. पाडवा तोंडावर असल्याने संध्याकाळी कॉलेज संपवून बाईकवरून मिरजेला यायला निघालो. येताना मध्ये थांबल्यावर श्रीपादला फोन करायचा ठरवला. तोवर अनिल देशमुख सरांचा फोन आला, ‘‘श्रीपाद बद्दल कळाल का?’’ मी म्हटलं “हो तो मुंबई अॅडमीट आहे” पलीकडून उत्तर आलं “श्रीपाद गेला”. ऐकून पायाखालची जमीनच सरकली. पुढे काय बोलाव तेच समजत नव्हतं. श्रीपाद या जगात नसणे हि कल्पनाच करणे अशक्य होतं. थोडावेळ गेल्यावर भानावर आलो, वास्तवाची जाण झाली. मी पुन्हा मार्गक्रमित झालो. बाईक सुरु झाल्यावर श्रीपादच्या एक-एक आठवणी नजरेसमोरून धावू लागल्या.
आमचा विद्यापीठातला मास कॉमचा पहिला दिवस... वर्गात येऊन बसलो. सारेच एकमेकांना अनोळखी. म्हणून मी मागे जाऊन बसलो. माझ्या शेजारीच गोरा गोमटा, मिसरूड फुटलेला, अत्यंत निश्चल आणि शांत चेहरा माझाकडे पाहत होता. दोघांनी एकमेकांना किंचित स्मितहास्य दिलं. मी जयेंद्र राणे, सांगली म्हणत माझी ओळख सांगितली आणि तो म्हणाला फक्त मी श्रीपाद कदम, दहीगाव, सातारा म्हणून गप्प बसला. श्रीपादची आणि माझी ही पहिली भेट. त्यानंतर श्रीपाद, मी सोबतच वर्गात बसू लागलो, त्याच्यासोबत मैत्री होणं ही अत्यंत स्वाभाविक आणि सहज गोष्ट होती. त्याचा स्वभाव निराळाच होता. का? कुणास ठाऊक? पण त्याच्यासोबत माझा एक कम्फर्ट झोन तयार होऊ लागला. मी १ नंबर हॉस्टेल जॉईन केलं, श्रीपाद २ नंबर हॉस्टेलला होता ते पण टी. व्ही. रूमला. मी आल्याच त्याला कळवलं, लगेच श्रीपाद दारात हजर झाला. त्याने स्वतःहून रूमची आवाराआवर सुरु केली, सामान नीट ठेवल्यावर बराचवेळ गप्पा मारत बसलो. नंतर श्रीपाद त्याच्या रूमवर झोपायला निघून गेला, तो कदाचित शेवटचाच. कारण त्यानंतर श्रीपादचं सामान केवळ त्याच्या रूम मध्ये होतं आणि श्रीपाद माझ्याच रूमवर. अगदी झोपायलाही त्याला तिकडे जाऊ वाटत नव्हत. अल्पावधीत आमच्यातलं नातं घट्ट होत गेलं. हळू हळू श्रीपाद मला कळत गेला. तो इतरांपेक्षा निराळा होता. वर्गात अत्यंत अबोल आणि शांत श्रीपाद, माझाजवळ निराळाच असायचा. माझासोबत असतांना त्याच बालपण जागं व्हायचं, स्वच्छंदी जगायचा तेव्हा. तो माझ्याजवळ आणि मी त्याच्या जवळ भरभरून बोलायचो.
असंच एकदा मोकळेपणात त्याने आपली कहाणी मला सांगितली आणि खरा श्रीपाद मला तेव्हा समजला. श्रीपाद राहायचा ते गाव अत्यंत छोटं. एस. टी. बस देखील येणे मुश्कील अशा इवल्याश्या गावातून श्रीपाद आला होता. श्रीपाद लहान असतांनाच आईचं छत्र हरपल होतं. आईच्या प्रेमाला मुकलेल्या जीवाला सांभाळायची जबाबदारी त्याच्या वडिलांची होती, पण उपेक्षा श्रीपादचा पिच्छा सोडणार नव्हती. आईच्या जाण्यानंतर वडिलांनी अचानकच घर सोडलं. ते कुठे निघून गेले ते आजवर कधी कळालं नाही. नियतीने त्याच्यावर जीवघेणा वार घातला होता. पण त्या इवल्या जीवाला तळहाताच्या फोडासारखं जपण्यासाठी दोन हात पुढे आले. श्रीपादचे मामा-मामी. श्रीपाद त्यांना ताई-दादाच म्हणायचा. त्यांनी त्याची सारी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून त्यांनी श्रीपादला लहानाचा मोठा केला. दादांनी शेती करत पोटच्या पोराला कुणी जपणार नाही, इतक्या लाडाने त्याला वाढवला, शिकवला. त्याला आई-वडिलांची उणीव भासू नये म्हणून आटोकाट प्रयत्न केले. प्रसंगी तोंडचा घास ताईंनी श्रीपादला भरवला. या साऱ्याची जाण श्रीपादला खूप होती. अभ्यासात श्रीपाद हुशारही होता. मास कॉम आधी त्याने फिशरीजमध्ये बी. एस. सी. चे शिक्षण चांगल्या मार्कांनी पूर्ण केलं होतं. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, नशिबाने आई-वडिलांना हिरावून केलेली त्याची उपेक्षा आणि वृध्द ताई-दादांची समर्थ साथ पाठीशी बांधत श्रीपाद भविष्याची स्वप्न घेऊन विद्यापीठात आला होता. या साऱ्या परिस्थितीने त्याला एक अनाकलनीय समज बहाल केली होती. त्याच्या इतके सहनशील आणि समजूतदार वागणे मी कुठेच पहिले नव्हते. त्या आमच्या साऱ्या गप्पानंतर श्रीपाद बद्दल मला भरूनही आलं आणि अभिमानही वाटू लागला. त्यादिवसानंतरचा श्रीपाद माझासाठी काही औरच होता. त्याचं मला खरंच खूप कौतुक वाटू लागलं. आमचे मैत्रीचे बंध आणखी घट्ट झाले. मी कुठल्या सणासाठी घरी आलो की मम्मी खास त्याच्यासाठी पुरणपोळ्या माझाकडून पाठवू लागली. त्या खातांना ताईंच्या आठवणीने श्रीपादचे पाणावलेले डोळे मी अनेकदा पुसलेत. त्याने फक्त मलाच हा लळा लावला असं नाही तर माझा रूम पार्टनर प्रशांतचा देखील तो अत्यंत जवळचा मित्र बनला. श्रीपादने तर त्याला न्यायमूर्ती लोखंडे असे विशेषण बहाल केले होते. आमच्या रूमवर तिघांच्या रोज रात्री अनेक विषयांवर गप्पा रंगायच्या. कधी कधी तर मी, श्रीपाद आणि दैनिक पुढारीचे अनिल देशमुख सर राजेंद्रनगरच्या रिंगरोडच्या फुटपाथवर रात्री दोन-दोन वाजेपर्यंत राजकारणापासून ते अगदी समाजकारणापर्यंत गप्पा मारत बसायचो. ऑफिस सुटल्यावर रात्री बारा नंतर कुठूनही भेळ पार्सल घेऊन देशमुख सर येणार हे नित्याचे गणित होते. एकमेकांच्या सहवासाने आम्हाला विलक्षण वेड लावले होते. कदाचित यामुळॆच इतरांपुढे गप्प-गप्प राहणारा श्रीपाद माझासोबत अधिकच खुलायचा. वर्गात आमची जय-विरूची जोडी म्हणून चेष्टाही होऊ लागली. त्याच्या स्वभावाची गोडी विभागातल्या डॉ. निशा पवार, अश्विनी कांबळे, अनिल देशमुख, नीरज नारकर, रत्नाकर पंडित यांच्या मनात देखील घर करून गेली. अल्पावधीत त्याने विभागात आपली शांत, संयमी आणि सुस्वभावी विद्यार्थी म्हणून ओळख निर्माण केली. रत्नाकर पंडित सरांच्या चपखल बोलण्याचा तो निस्सीम चाहता होता.
वडिलांच्या रिटायरमेंट नंतर माझा आर्थिक स्त्रोत मंदावला होता. खर्चाचा डामाडोल बिघडला होता. तेव्हा विद्यापीठात चहा पिणं सुद्धा जमत नव्हतं. श्रीपादची परिस्थिती देखील माझाहून निराळी नव्हती. तेव्हा कित्येकवेळी मी आणि श्रीपादने एक हाफ चहा सुद्धा अर्धा-अर्धा करून एकाच ग्लास मध्ये पिला होता. रविवारी एकवेळचे जेवण असल्याने एक ऑम्लेट दोघात खाल्ले होते. बाहेर जाऊन खाण्याची न त्याची ताकद होती ना माझी. अशा छोट्या-छोट्या पण अत्यंत महत्वाच्या क्षणांनी आमचं नातं मैत्रीच्या पलीकडे आम्ही घेऊन गेलो. बायोलॉजीचा विद्यार्थी असल्याने त्याला फुलांची आणि निरनिराळ्या प्रजातीच्या कीटकांची आवड होती तर मला फोटोग्राफीची खूप आवड होती. यामुळेच विद्यापीठातला एक अन एक कोपरा आणि प्रत्येक रस्ता त्याने आणि मी सोबत पिंजून काढला होता. एकदा केआयटी कॉलेज मध्ये लघुपट स्पर्धा आयोजित केली होती. त्यात आपला लघुपट असावा म्हणून त्याने हट्टच लावला होता. त्या कामी आम्हाला डॉ. निशा पवार आणि नीरज नारकर यांनी मोलाची साथ दिली. आमच्या लघुपटाला तृतीय क्रमांक मिळाला. त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. केआयटी मध्ये निकाल कळल्यावर त्याने मला मारलेली घट्ट मिठी मला आजही जाणवते. आमच्या त्या लघुपटात केवळ एकच मानवी हात होता आणि तो श्रीपादचा होता. तोच आमच्या लघुपटातला एकमेव अभिनेता होता. आपण काहीतरी करू शकतो याच समाधान त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होतं. श्रीपाद आणखीनच मनात घर करू लागला होता.
साताऱ्याच्या भूमीतून आलेल्या श्रीपादला कास पठारावर डॉक्युमेंटरी करायची होती. त्याने त्याचा चांगला अभ्यास सुरु केला होता. शुटिंगसाठी त्याच्या सोबत मी आणि गुरु स्वामी दोघे त्याच्या गावी गेलो. रात्री मुक्काम करून सकाळी शुटींगला निघण्याचा आमचा प्लान ठरला. त्याने संध्याकाळी आम्हाला त्याचा सगळा गाव फिरून कौतुकाने दाखवला. समाजमंदिरात बसून आम्ही दुसऱ्या दिवसाचे नियोजन केले. रात्री ताईंनी भाकरी आणि घेवड्याची उसळ प्रेमाने वाढली. ताई-दादा, श्रीपाद, मी आणि गुरु रात्री निवांत गप्पा मारून झोपलो. सकाळी कशीबशी एका गाडीची जुळवाजुळव करून आम्ही कास ला पोहोचलो. त्याचं कास पठारावर डॉक्युमेंटरी करण्याचं स्वप्न खूप जुनं होतं. ते प्रत्यक्षात येणार होतं. पण पुन्हा एकदा त्याच्या पदरी उपेक्षा आली. पावसाच्या अभावाने तेव्हा कासवरची फुलं वाळून गेली होती आणि श्रीपादचे स्वप्नही कोमेजून गेले. हताश होऊन आम्ही गावी परत आलो. लगेच कोल्हापूरला निघालो. खरंतर त्यावेळी आमच्या तिघांच्याही खिशात मिळून नव्वद रुपये उरले होते. आम्ही कसेबसे साताऱ्याला पोहचलो, पण नव्वद रुपयात कोल्हापूर कसं गाठायचं समजेना. शेवटी एका ट्रक मध्ये बसून आम्ही कोल्हापूरला पोहचलो. ड्रायव्हरने दीडशे रुपये मागितले पण त्याला परिस्थिती सांगितली आणि हातात नव्वद रुपये ठेवले अन त्यानेही शांतपणे ते घेतले. सकाळी नाश्ता करून बाहेर पडलो होतो आणि कोल्हापुरात पोहचलो तेव्हा रात्रीचे बारा वाजले होते, हायवे वरून चालत विद्यापीठ गाठले, तिघांच्याही पोटात खड्डा पडला होता. अशावेळी आमचा एकच तारणहार आम्हाला आठवत होता. देशमुख सरांना फोन केला आणि हकीकत सांगितली. त्या रात्री पुन्हा त्याच फुटपाथवर आम्हा चौघांचा दोन वाजेपर्यंत भेळेचा डाव रंगला. डॉक्युमेंटरीचा झालेला फज्जा आम्ही हसत तिथे हवेत उडवला.
खरंतर लहानपणापासून प्रेमाच्या भुकेल्या श्रीपादला तरुण वयातल्या प्रेमाचा मोह होणं साहजिक होतं. श्रीपादने एकांतात मला तिच्याबद्दल सांगितलं. तिच्याबद्दल बोलतांना त्याच्या चेहऱ्यावरची लाली बघून मी खूप हसलो होतो. त्याने खूप मनापासून तिला जीव लावला होता. ताई-दादांनीही पाठिंबा दिला. नियतीने उपेक्षा श्रीपादच्या पाचवीलाच पुजलेली होती की काय कुणास ठाऊक? इथेही त्याला उपेक्षेशिवाय काहीच पदरी पडले नाही. तिच्या लग्नाची तारीख ठरल्याच त्यानं मला सांगितलं. श्रीपादला पहिल्यांदाच मी इतका हतबल आणि खचलेला पहिला. आयुष्य खूप मोठं आहे, अजून खूप जगायचंय म्हणत त्याला सावरायला म्हणून मिठीत घेतलं तर मध्येच उठून त्याने त्याचा नेहमीचा आनंद चित्रपटातला डायलॉग मारला – “बाबूमोशाय... जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहिये...” असं म्हणत हसत चालू लागला. क्षणात हळवा अन क्षणात कणखर हा श्रीपादचा नवा अवतार मी तेव्हा अनुभवला. त्याच्या या डायलॉगची मला सवय झाली होती. पण नियती श्रीपादची अशी चेष्टा करेल असं वाटलं नव्हतं. आनंद मधला राजेश खन्ना आणि श्रीपाद यात इतकं साम्य केवळ कल्पनातीत. तो ही कन्सरनेच अवेळी गेला आणि श्रीपाद देखील. तोही आपल्या आयुष्यात सगळ्यांना आनंद वाटत गेला आणि श्रीपादही. तोही परिस्थितीच्या दुःखाचं रडगाणे गायला नाही आणि श्रीपादही. चित्रपटातला आनंद माझ्या आयुष्यात बाबूमोशाय श्रीपादच्या रूपानेच आला होता. त्याने विद्यापीठातल्या दोन वर्षांच्या सहवासात जगण्याची रीत मला शिकवली होती. मी त्याचा आयुष्यभराचा ऋणी झालो. शिक्षणानंतरही आमचा हा ऋणानुबंध असाच पुढे सुरु राहिला. प्रत्येक आठवड्यात त्याचा एक फोन नक्की असायचा. फोन आला की किमान एक तासतरी नक्की बोलणं व्हायचं. व्यावसायिक आयुष्यातल्या खडतर चार वर्षा नंतर श्रीपाद साताऱ्याला पुढारी मध्ये रुजू झाला. आता हळू हळू श्रीपाद स्थिर होऊ लागला होता. घर बांधून लवकरच लग्नाच्या बेड्यात अडकतोय म्हणून त्याने मला कळवलं होतं. माझा उर तेव्हा भरून आला होता. आयुष्यभर नियतीशी झगडत, संघर्ष करत श्रीपाद आता डौलाने उभा राहणार होता, ताई-दादांच्या म्हातारपणाची भक्कम काठी बनत होता. पण अचानक आलेल्या कावीळ आणि कॅन्सरच्या वादळाने माझ्या बाबूमोशायचा श्वास थांबला. क्षणार्धात सगळ्या स्वप्नांचा चुराडा झाला. ताई-दादांचा श्वास हरपला.
श्रीपाद तुझ्या मैत्रीने मला जगणं शिकवलस आणि तूच असा अर्ध्यावर डाव सोडून गेलास. अजून खूप काही करायचं होत तुला. शेवटपर्यंत सुख नावाची गोष्ट तुझा आयुष्याने कधी पहिलीच नाही. तुझ्या जाण्याने कोणी काय गमावलं माहित नाही. पण एक नक्की ताई-दादांनी त्यांच्या जगण्याची आस आणि मी माझ्या मैत्रीचं सर्वस्व गमावलं. आज तुझ्या दहाव्याला घरी आलो तेव्हा साऱ्या आठवणी अंगावर आल्या. ज्या समाजमंदिरात आपण गप्पा मारल्या त्याच समाजमंदिरात तुझा फोटोला फुलं वाहतांना काळजाचं पाणी झालं. ताई-दादांकडे पाहताना तुझी प्रतिमा नजरेसमोरून हलत नव्हती. तुझ्या दहाव्याच्या जेवणाचा घास घशातून खाली उतरत नव्हता. राहून राहून तुझा माझा एका ग्लासचा अर्धा अर्धा चहा आठवत होता. काळजाला चटका लावून तुझं निघून जाणं आजही खरं वाटत नाही. अजूनही वाटतं कधीही तुझा फोन येईल आणि तू म्हणशील- “बाबूमोशाय... जिंदगी....!”

Friday, July 31, 2015

जेव्हा फाशीलाही रंग चढू लागतो...

स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये खूपच कमीवेळा किंवा अत्यंत दुर्मिळ समयी संपूर्ण देश एकाच रंगात रंगलेला दिसला आहे. आजवर मानवतावादी विचारसरणीची परंपरा वर्षानुवर्षे देशाने अभिमानाने जपली आहे. कधी काळी याच देशात धर्माधर्मातील विविधतेतून एकता प्रस्थापित कशी करायला हवी याचा संदेश समस्त जगाला दिला आहे. पण आपण कधीकधी हे सुद्धा विसरतो कि असाही कधीतरी माझा देश होता. धर्मांधतेच्या अंधारात आपल्या धमन्यांमधील रक्ताचा रंग बदलायला सुरुवात होते आणि शेवट सुद्धा त्याच अंधारात कुठेतरी अडगळीत होतो. १९९३च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी याकुब मेमनला काल त्याच्या कुकर्माची फळे मिळाली अशी हेडलाईन प्रत्येक वृत्तवाहिनीवर धडाडत होती.
      खरतरं त्या हेडलाईन पाहून ऊर भरून आला, समाधानाने डोळे पाणावले. धर्माच्या आडाणे म्हणा वा इतर कुठल्याही कारणाने म्हणा पण इथे जन्माला येऊन अशी कुकर्म करणाऱ्यांची संख्या देशात बोटावर मोजण्या इतकीच आहे. याकुबला देहांताची शिक्षा म्हणजे त्याचच एक उदाहरण आहे. आपल्या सुदैवाने अशी फाशी झालेल्या गुन्हेगारांची संख्या खूपच कमी आहे म्हणजेच इथे खूपच कमी लोक कुकर्म करतात किंवा ज्यांना फाशी झाली नाही त्यांनी म्हणावी तितकी कुकर्म केली नव्हती. मग अशा लोकांची तर खूपच नाव आहेत. याकुब मेमन हा गुन्हेगार होता यात तिळमात्रही शंका असण्याचं कारण नाही, तो मुंबई बॉम्बस्फोटातील २५७ निरपराध जीवांचा हत्यारा होता हे सुद्धा स्पष्ट आहे. त्यामुळे त्याला शिक्षा ही मिळालीच पाहिजे, त्याला शिक्षा होणं हाच त्या बळी गेलेल्या निरपराधांना न्याय मिळवून देणं आहे. आपण सगळ्यांनी मिळून त्यांना न्याय मिळवून दिलाय. इथल्या न्यायव्यवस्थेने २२ वर्षांनी का होईना पण न्याय मिळवून दिला.
      निश्चितपणे या केसची दाहकता सर्वाधिक होती. त्यामुळे जनमताचा रेटा देखील तितकाच प्रभावशाली होता. पण याची दुसरी बाजू देखील विचार करायला लावणारी होती. याकुबला पकडल्या नंतर तो माफीचा साक्षीदार म्हणून शरण आला, त्याने आपल्या तपास यंत्रणांना सर्व सहकार्य केले, स्वतःच्या भावाविरोधात पुरावे दिले, गुन्हा कबूल करून संपूर्ण गुन्ह्याची माहिती दिली. मग एवढे सगळे झाल्यावर अजून त्याला माफीचा साक्षीदार मानायचा नाहीच पुन्हा वर त्याच्याकडून आणखी काय अपेक्षा ठेवायच्या होत्या. कि सरकार अथवा तपास यंत्रणांना त्याने स्वतः जाऊन या हल्ल्याचा खरा सूत्रधार टायगर मेमनला जिथे असेल तिथून पकडून आणून भारताच्या हवाली करायचे असे अपेक्षित होते आणि तेव्हा मग त्याला आपण माफीचा साक्षीदार घोषित करणार होतो का? जर हीच अपेक्षा होती तर मग आपल्या तपास यंत्रणा काय कामाच्या आहेत? मुळात गेली अनेक वर्षे टायगर हाती लागत नाहीये, दाऊद इब्राहिम कुठे आहे, काय करतो, काय खातो याची इतंभूत माहिती असताना देखील पकडलं जात नाही त्याचा कोण विचार करायचा? याकुबला फाशी देऊन आम्ही आमचं देशप्रेम सिध्द केल आहे असा डंका वाजवायची काहीच गरज नाहीये. खरच देशप्रेम सिध्द करायचं असेल तर पाकिस्तानात जाऊन दाउद, टायगर, हाफिज सईदला पकडून आणायची धमक आपण का दाखवत नाही? तिथे का आम्ही पाकिस्तानच्या विनवण्या करत बसतो कि त्यांना आमच्या ताब्यात द्या? आपण नको त्या ठिकाणी अमेरिकेचं खूप कौतुक करत असतो, त्यांनी पाकिस्तानात घुसून ओसामाला शोधून यमसदनी धाडलं हे का विसरतो? इथे नाही का आठवत देशप्रेम? इथे का ५६ इंची छाती थिटी पडते?
      पिंजऱ्यात सापडलेल्या उंदराला फासावर लटकवून आपला यशाचा झेंडा फडकवण्यात कसला पुरुषार्थ? मुळात त्याने २० वर्षे जेलमध्ये काढली होतीच, आधीच अर्धमेल्या झालेल्याला पूर्ण मारून काय साध्य केलं? त्यापेक्षा त्याला आयुष्यभर कैदी बनवून सडवत ठेवलं असतं, तर एक दिवस त्यानेच फाशीची याचना केली असती तर आपली सुडाची भावना तरी नीट पूर्ण झाली असती. असाही याकुबच्या फाशीमागे न्याय कमी आणि सूड अधिक वाटत होता. सर्वांना समान न्याय ही संकल्पना तर केवळ राज्यघटने पुरती मर्यादित आहे कि काय असे वाटू लागले आहे, तसे नसते तर मुंबई साखळी स्फोटाला कारणीभूत असलेली बाबरी मशीद प्रकरणातील आरोपी अजून न्यायपालिकेच्या नजरेत आलेलेच नाहीत, ते कसे? श्रीक्रुष्ण आयोगाच्या स्पष्ट अहवालानंतर देखील ना कॉंग्रेस ना भाजप सरकारच्या छातीमध्ये तेवढा दम आहे कि त्यातील आरोपींना शिक्षा सोडा पण अटक करता येईल? जे आजही छाती ठोकून बाबरी पडल्याचा अभिमान सांगतात त्यांच्या पुढे का आम्ही बांगड्या घालतो? तिथे कुठे जाते ही देशसेवा आणि देशप्रेम? गुजरात जातीय दंगलीमध्ये हात धुऊन घेतलेले आरोपी शिक्षेपासून वंचित का राहतात? तिथे तर २५७ पेक्षा कितीतरी अधिक निरपराध सर्वांसमक्ष बळी गेले. ते कुकर्म नव्हतं तर काय सत्कर्म होतं? मालेगाव बॉंबस्फोटाच्या आरोपींकडे का अजून लक्ष जात नाहीये? तिथे का डोळे झाकले जातात? इथेच वेळ काढूपणा का अवलंबला जातो? इथेच नेमका मग धर्माचा वास यायला सुरुवात होते. जाणीवपूर्वक बचावाचा पवित्रा का घेतला जातो?
      दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधीच्या हत्येतील आरोपी म्हणून सिध्द झालेले फाशीच्या शिक्षेवरून जन्मठेपेमध्ये कसे ओढून आणले जातात? का तर त्यांना राजकीय पाठबळ मिळतंय म्हणून? म्हणजे देशप्रेमाचा झेंडा राजकीय खेचाखेचीत सोयीनुसार गुंडाळून ठेवला जातो तर. भाजपला देशप्रेमाचे खूप फेफरे येतात, मग काश्मीर मध्ये फुटीरवाद्यांच्या हातात हात देणाऱ्या पीडीपी पक्षासोबत खांद्याला खांदा लावून सरकार बनवताना हे आठवत नाही का देशप्रेम? भाजपच काय इथला प्रत्येक पक्ष सोयीनुसार राजकारण खेळतो, तो काँग्रेस असो कि आणखी कुणी. सगळे इथून तिथून सारखेच. यांना गरज पडते तेव्हा देश आठवतो, नाहीतर इतर वेळी यांचा आपला आरोपांचा एकमेकांवरील देवाणघेवाण कार्यक्रम चालूच असतो.

      मुंबई बॉम्बस्फोटातील इतर १० आरोपींना कशासाठी जन्मठेप दिली जाते? त्यांच्यासाठी का फाशी लागू होत नाही? देशाचे थोर सुपुत्र संजय दत्तला याकुबच्या आधी फाशी द्यायला हवी होती. केवळ कुटुंब एका पक्षाशी निगडीत आहे म्हणून त्याला वेगळ्या नजरेने पाहण्याची काय गरज पडते? पाकिस्तान आणि आयएसआय च्या विरोधात धाडणाऱ्या बाळासाहेबांच्या तोफा नेमक्या या संजय दत्तच्या पाठीशी कशा उभ्या राहतात? देशप्रेम, राष्ट्रवाद असले शब्द तेव्हा हवेतच विरघळलेले असतात. वर अजून देखील हा बाबा तर आपले चित्रपट चित्रीकरण पूर्ण करण्यासाठी जेल मधून मजेत सुट्ट्या घेऊन बाहेर पडतो. अर्ज न करताही या महाभागाला दया दाखवली जाते. इथे यांना मानवतावादी दृष्टीकोण बरा सापडतो. मग याकुब एकटाच का दोषी धरला जातो? या बाकीच्यांनी काही अपराध केलेलेच नाहीत कि काय अशी शंका येते. याकुबच्या फाशीलाच फक्त मग कुठला वेगळा रंग दिला गेला होता का? आणखी किती दिवस हे असे झेंड्यांच्या रंगांचे खेळ हा देश पाहणार आहे? आणखी किती दिवस न्यायापुढे सर्व समान ही फक्त संकल्पना म्हणून राज्यघटनेतील ओळ बनून राहणार आहे हे भारत भाग्य विधाताच जाणो.